औरंगाबादमध्ये पुराची भीती; 17 गावांच्या ग्रामस्थांना हलविले

औरंगाबादमध्ये पुराची भीती; 17 गावांच्या ग्रामस्थांना हलविले

औरंगाबाद - जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नाशिक; तसेच नगर जिल्ह्यात तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे रविवारपासून (ता. चार) दारणा, गंगापूर आणि पालखेड या तीन धरणसमूहांमधून गोदावरी नदीपात्रात दोन लाखांहून अधिक क्‍युसेक असा विसर्ग सुरू आहे. 2006 नंतरचा जायकवाडी नदीपात्रात सोडण्यात आलेला हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांनी सावध राहावे, आपत्कालीन विभागदेखील लक्ष ठेवून आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, वैजापूर, गंगापूर तालुक्‍यांतील 17 गावांतील अनेकांना इतरत्र हलविण्यात आले आहे.  याबाबत पाटबंधारे विभागाकडून पूर्वकल्पना मिळताच जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, स्थानिक महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन; तसेच शासकीय यंत्रणा व राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांच्या विशेष पथकाच्या सहकार्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत वैजापूर तालुक्‍यातील नागमठाण, चेंडूफळ, डोणगाव, बाभूळगाव गंगा, बाबतारा, वांजरगाव, शिंदे वस्ती आणि पुरणगाव; तसेच गंगापूर तालुक्‍यातील नेवरगाव, हैबतपूर, बागडी, जामगाव, ममदापूर, आगर कानडगाव, अंमळनेर, लखमापूर व कायगाव या 17 गावांमधील 463 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 
यापैकी सर्वाधिक पुराचा फटका बसलेला भाग गंगापूर तालुक्‍यातील वांजरगावमधील शिंदे वस्ती हा असून, सदर वस्ती रविवारी रात्रीतून लाडगाव येथील शाळेत सुखरूप हलविली आहे. विस्थापितांना प्रशासनामार्फत; तसेच सामाजिक संस्थांमार्फत मदतकार्याच्या स्वरूपात नाश्‍ता, जेवणाची व पिण्याच्या पाण्याची; तसेच आरोग्य सेवेसाठी आरोग्य पथकाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे; तसेच महत्तम विसर्गाने प्रभावित होणाऱ्या नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यादृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) 5वी तुकडी, पुणे यांच्या विशेष पथकास पाचारण करण्यात आले आहे.

 नांदूर-माधमेश्वरवरून झालेला विसर्ग प्रत्यक्षात पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात संचयित होण्यासाठी साधारणत: 24 ते 30 तासांचा अवधी अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्यक्षात रविवारी दुपारी चारनंतर सोडण्यात आलेला मोठ्या प्रमाणातील विसर्ग हा सोमवारी (ता. पाच) संध्याकाळी जायकवाडी धरण क्षेत्रात संकलित झाला असून 25 टक्‍क्‍यांच्या पुढे पाणीपातळी सरकली आहे. 

भीती बाळगू नका  
संभाव्य होत असलेल्या मोठ्या विसर्गाचा विचार करता, सदर पाणीपातळी ही मंगळवारी (ता. सहा) सायंकाळी 7 वाजेपर्यंत 35 टक्‍क्‍यांच्या पुढे जाण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी जायकवाडीतून गोदावरी पात्रात कोणताही विसर्ग सोडण्याबाबतचे नियोजन नसल्याने जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील तसेच पैठण येथील रहिवासी नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन श्री. चौधरी यांनी केले आहे. 

Web Title: Villagers Shifting to Safer Places in Aurangabad District

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com