शेतकरी संपाची आता गरज नव्हती - राजू शेट्टी

शेतकरी संपाची आता गरज नव्हती - राजू शेट्टी

सांगली - ‘राज्यात शेतकरी संपाची आता गरज नव्हती. वेळही योग्य नाही. या घडीला देशपातळीवर शेतकऱ्यांचा दबाव निर्माण करायला हवा,’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. सरकार पुरस्कृत संप आहे. दूध  संघांचे पैसे घेऊन तो सुरू आहे, अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली. पश्‍चिम महाराष्ट्रात संपाचे अस्तित्वात नाही. त्याबाबत या नेत्यांनी भूमिका मांडली.

श्री. शेट्टी म्हणाले,‘‘चळवळीला विरोध नाही. त्यांना शुभेच्छाच. मात्र गेल्यावर्षी संप झाला. त्याचा उद्देश जनजागृती, सरकारचे लक्ष वेधण्याचा होता. तो साध्य झाला. आता देशभर संघटनांना एकत्र करतोय. दिल्लीत किसान संसद घेतली. अडीच लाख शेतकरी आले. इतिहासात पहिल्यांदा देशातून एवढा मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट पैसे मिळावेत, या विधेयकाला देशातून समर्थन मिळाले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. गावागावातून ठराव आले. एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन आले. २२ राजकीय पक्ष, ९३ शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. लढा इतक्‍या टोकाला आला असताना संपाची गरज नव्हती. मॉन्सून सुदैवाने चांगला होईल, असा अंदाज आहे. दोन वर्षांत नुकसान झाले. आता पेरण्या करू द्यात.’’ 

श्री. पाटील म्हणाले,‘‘संप सरकार पुरस्कृत आहे. मागचा संप गिड्डेने मोडला. तोच नेतृत्व करतोय. आंदोलनाची पद्धत असते. ज्या विषयाचे आंदोलन असते, त्याची बाजारातील परिस्थिती पाहायची असते. साठा किती, थांबलो तर अडचण काय होईल, अभ्यास करावा  लागतो. अजित नवलेंनी दूध रोखले. दूध बंद करा, ही संघांचीच भूमिका होती. त्यात संघांचाच फायदा आहे. त्यांनी ह्यांना पैसे पुरवून आंदोलन करवून घेतलेय. टंचाईत आंदोलन करायचे असते.’’

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com