माझ्या पाकिस्तान दौऱ्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारतील - नवज्योत सिंग सिद्धू

माझ्या पाकिस्तान दौऱ्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारतील - नवज्योत सिंग सिद्धू

जयपूर : 'माझ्या पाकिस्तान दौऱ्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारतील व शांतता प्रस्थापित होईल असा मला विश्वास आहे,' असे मत काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी रविवारी (ता. 2) व्यक्त केले. सिद्धू यांचे मित्र व नुकतेच पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा भार स्विकारलेले इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला सिद्धू उपस्थित होते. 

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर भारतात अनेक दहशतवादी हल्ले झाले, पण माझ्या पाकिस्तान दौऱ्यानंतर भारत-पाकमध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी आशा सिद्धू यांनी व्यक्त केली. या दोन्ही देशांमध्ये पहिल्यापासून शत्रूत्वाची भावना जरी असली, तरी पाकच्या नव्या पंतप्रधानांना आता शांतता हवी आहे, असे सिद्धू यांनी सांगितले. 

'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्याहून आल्यानंतर कारगिलचे युद्ध घडले, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर पठाणकोटवर हल्ला झाला. पण माझ्या दौऱ्यानंतर लहान घटना सोडल्या तर काही घडले नाही, तसेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी माझ्याकडे शांततेची इच्छा व्यक्त केली आहे,' असे स्पष्टीकरण सिद्धू यांनी दिले.  

अजमेर येथे आयोजित 'सोच से सोच की लडाई' या युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सिद्धू यांचा पाकिस्तान दौरा चांगलाच गाजला. सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com