काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले : मायावती
नवी दिल्ली : काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे हे आता सिद्ध होते, की काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशा शब्दांत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी किमान वेतन देण्याची शाश्वती दिली. त्यांच्या या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मायावती म्हणाल्या, ''यापूर्वी 'गरीबी हटाओ'चे आश्वासन देण्यात आले होते. अशाचप्रकारे राहुल गांधी यांनी हे आश्वासन दिले आहे''.
मायावतींनी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपवर कडाडून टीकास्त्र सोडले. त्यांनी राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांशी केली आहे.
मायावती म्हणाल्या, ''राहुल गांधींनी दिलेले आश्वासन 'गरीबी हटाओ'सारखेच वाटत आहे. तसेच सध्याच्या सरकारने काळ्या पैशाविरोधात आश्वासन दिले होते. त्यांनी देशातील प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आणि 'अच्छे दिन'चे आश्वासन दिले होते. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष यामध्ये अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता हे सिद्ध होते, की काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत''.
Web Title: Congress and BJP failed to fulfill promises made to both the parties: Mayawati
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.