पंढरपूर - आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढविणार असल्याची घोषणा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज केली. या घोषणेमुळे हातमिळवणीस उत्सुक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत केलेल्या आघाडीमुळे मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढू शकते. काँग्रेसला दिलेली ३० जानेवारीपर्यंतची मुदत संपली असून आता सर्व जागा लढविण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला. तसेच, जिथे सभा होईल, तिथे उमेदवार जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज माढा लोकसभा मतदारसंघातून धनगर समाजाचे नेते ॲड. विजय मोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
‘आरक्षणाबाबत खरा रोष’
आरक्षणाबद्दल ॲड. आंबेडकर म्हणाले की, मराठा व ओबीसींमध्ये आरक्षणाबाबत खरा रोष आहे. एकाही मराठा नेत्याने ओबीसी आरक्षणास भाग एक व मराठा आरक्षणास भाग दोन करा, असे म्हटले नाही. मराठा नेत्यांवर ओबीसी समाज विश्वास ठेवायला तयार नाही. हे नेते स्वतःचे वर्चस्व टिकविण्यासाठी १६ टक्के अधिक ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे ओबीसींच्या मनात त्यांच्याबद्दल भीती आहे.
Web Title: All 48 seats in Maharashtra will be contested in Lok Sabha elections: Dr. Prakash Ambedkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.