BLOG - परिणाम "टीका आणि सूड" चा; इंदिराजी ते मोदी, एक वर्तुळ होणार पूर्ण ? 

BLOG - परिणाम "टीका आणि सूड" चा; इंदिराजी ते मोदी, एक वर्तुळ होणार पूर्ण ? 

भाजप पुन्हा सरकारमध्ये येणार का याबद्दल मला शाश्वती नाही त्याचं कारण असं की, 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली जे की पूर्णतः चुकीचं होतं त्याचं मीही समर्थन करत नाही, आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत (1977) इंदिरा गांधींना खूप मोठा धक्का बसला कारण स्वतः इंदिराजी आपला बालेकिल्ला रायबरेलीतून पराभव झाल्या आणि मोरारजी देसाई यांचं सरकार आलं (जनता पार्टी) जे स्वाभाविक होतं कारण त्याचा त्रास राजकारण्यांना झालाच तो इतका की बऱ्याच बड्या नेत्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. बरं काँग्रेसचं सरकार गेलं पण काँग्रेसेत्तर सरकार म्हणजे जनता पार्टीनं नंतर जे केलं त्याला कारणीभूत ते स्वतःच होते की. आणीबाणीत ज्या नेत्यांना तुरुंगाची हवा खावी लागली ते हे सर्व कसं विसरु शकतात आता सरकार तर त्यांचंच होतं. मिळेत ते आणि तसं इंदिराजींना टार्गेट करु लागले. (आणि टार्गेट करणंही स्वाभाविक आहे, इंदिराजींनी केलंच असं होतं)  चरण सिंहांनी इंदिराजींना तर अटक करण्यासाठी थेट सीबीआयच पाठवली आणि अटकही केली.   त्यांच्यात सुद्धा मतभेद होतेच की, कोण पंतप्रधान होणार ? मोठा नेता कोण ? असा संघर्ष सुरु होता सरतेशेवटी मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. (मी त्यांच्या संघर्षात जात नाही, नाहीतर विषयांतर होईल) आणि ध्येय फक्त एकच इंदिराजींवरील संताप. एकेकाळी देशावर आणि नागरिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या इंदिराजी आता पुरत्या हतबल झाल्या होत्या, एकीकडे विरोधकांसोबतची लढाई तर दुसरीकडे पक्षातील अंतर्गत लढाई. (मला इथे लहानपणीच्या गोष्टीचा संदर्भ द्यायला आवडेल तो म्हणजे ससा आणि कासवाची शर्यत, कासव हळू चालतो म्हणून ससा निवांत राहिला आणि शेवटी कासव शर्यत जिंकला) 


अशाच प्रकारे जेव्हा सरकार टार्गेट करत होतं तेव्हा इंदिराजींचं लक्ष बिहारमधल्या बलछी गावाकडं गेलं, बलछी गावातील काही लोकांनी दलित वस्तींवर हल्ला करुन बऱ्याच जणांना जिवंत जाळलं होतं जी खूपच ह्रदयद्रावक घटना होती, खूप लोकांनी इंदिराजींना तिथे जाण्यापासून रोखलं मात्र त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही.  जेव्हा इंदिराजींनी त्या दलित वस्तीतील लोकांची भेट घेतली तेव्हा आपला कुणीतरी वाली आहे ही जाणीव तिथल्‍या लोकांनी झाली आणि पुन्हा एकदा इंदिराजींनी लोकांच्या मनात जागा केली. (तोच इंदिराजींच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला, सध्याच्या काँग्रेसमध्ये असा टर्निंग पॉईंट येईल याची शाश्वती नाही) खरंतर हा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे बलछी गावातल्या घटनेकडं सरकारनं लक्ष देण्याची गरज होती, तिकडे जाऊन भेट देण्याची गरज होती, त्या पीडित लोकांना मायबापाच्या (सरकार) नात्यांनं कवटाळणं गरजेचं होतं मात्र सरकारनं तसं केलं नाही कारण त्यांचं टार्गेट जनतेचा विकास नव्‍हता, तर फक्त इंदिरा, इंदिरा आणि इंदिरा एवढंच होतं. 

त्‍यावेळच्‍या सरकारनं आपलं टार्गेट जनतेचा विकास एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलं असतं, तर आज‍ही जनता पार्टीचा दबदबा पाहायला मिळाला असता. असो, हे आपलं आणि आपल्या भारताचं दुर्दैव. आता सध्याची स्थिती तुम्हाला सांगतो गेल्या जनता पक्षानं सर्व पक्षाला सोबत घेण्याचा नाराही दिला नव्हता आणि तसं वागलेही नव्हते पण सध्याच्या भाजप सरकारनं तर तसा नारा दिला होताच की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की विरोधक आणि सत्ताधा-यांना सोबत घेऊन काम करण्‍याची घोषणा केली हाती.  विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपल्यासमोर फक्त देशाचं हित आहे हे समजून काम करत राहणं. (खरंतर विरोधकांचं काम असतं टीका करणं ते त्यांना करु देत हाथी चले बाजार, कुत्‍ते ...... हजार या उक्‍तीप्रमाणं आपलं काम करणं अपेक्षित असतं. ) हे ऐकायला छान वाटलं होतं.  सरकार एकमेकांची उणीदुणी काढत बसण्यापेक्षा देशासाठी काहीतरी करतील, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली.  पंतप्रधान मोदींच्‍या प्रत्‍येक भाषणात फक्त विरोधकांवर टीका, टीका आणि टीकाच ऐकायला मिळू लागली.  तुम्ही करायचं काम आम्‍ही करतोय, तुमच्‍या चुका दुरुस्‍त करण्‍याचं काम आम्‍हाला करावं लागतंय, असंच सांगायला सुरुवात केली.  पण पंतप्रधानांचं भाषण नेहमीच प्रचारकी थाटाचं होत गेलं आणि अजूनही होतंय. आता तर पाच राज्‍यातल्‍या विधानसभा निवडणुका सुरु आहेत. यानिमित्‍तानं ते आम्‍ही काय करतोय, हे सांगण्‍यापेक्षा तुम्‍ही कुठेकुठे चुकलात, हेच सांगत सुटतील. (माझे आजोबा नेहमीच म्हणतात काँग्रेस कसंही असो पण त्यांना जनतेची काळजी होती मात्र सध्याच्या सरकारला तशी काळजी नाही) बरं घोषणाबाजी आणि अंमलबजावणी यामध्ये फरक आहेच की. 

80 च्या दशकातल्या गोष्टीची मला इथं आठवण होतीये. जनता पार्टीनं इंदिराजींना टार्गेट करुन सत्ता गमावली तशी भाजप सरकारवरही अशी वेळ येऊ शकते. जनता पार्टीनं फक्त इंदिराजींना लक्ष्य केलं तसंच भाजप सरकारही काँग्रेसला लक्ष्य करण्यात गुंतलं आहे. खरंतर विरोधक टीका करत असताना सत्ताधाऱ्यांनी भविष्यात काय करणार आहोत या गोष्टी न सांगता वर्तमान काळात आपण काय केलंय या गोष्टी सांगणं अधिक उपयुक्त ठरतं पण सध्या टीकेचं सत्र इतकं जोरात सुरु आहे की कोणती गोष्‍ट व्‍यक्‍तीगत आणि कोणती सार्वजनिक याचंही भान राखलं जात नाही. 

पूर्वी इंदिराजी लक्ष्य होत्या तसंच आता काँग्रेस लक्ष्य आहे. मोदींसमोर आता फक्त काँग्रेस, काँग्रेस आणि काँग्रेसच आहे तेही पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून ते भाजपच्या नगरसेवकांपर्यंत प्रत्येक जण फक्त काँग्रेसबद्दलच बोलतोय पण जो नारा देत मोदींनी सत्ता सुरु केली त्याबद्दल आता काहीच चर्चा होत नाही. प्रत्येक भाषणात काँग्रेसवरच टीका होत असेल तर सामान्य नागरिकही या भारतात राहतात याची जाणीव त्यांना करुन दिली पाहिजे. त्यामुळं पूर्वी ज्या कारणानं जनता पार्टीची सत्ता गेली (फक्त टार्गेट इंदिराजी) तेच निमित्त आता मिळू नये म्हणजे झालं. पण शेवटी एवढंच सांगतो की, "टीका आणि सूड" या चित्रपटात सध्या सामान्य माणसाची फरफटत होतीये एवढं मात्र नक्की.......

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com