पुणे : भारतातील 15 उद्योगपतींसाठी सव्वातीन लाख कोटींवर पाणी पडले, नीरव मोदी आणि अनिल अंबानी यांनी देशाला किती नोकऱ्या दिल्या असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (ता. 5) हडपसर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे विद्यार्थांशी संवाद साधताना उपस्थित केला.
''भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे श्रेय हवाई दालालाच मिळायला हवे. भारताने हवाई हल्ला करणे आवश्यक होते. भारत हा शक्तिशाली देश आहे हे वेळोवेळी दाखवून देणे गरजेचे आहे आणि ते आपल्या देशाच्या सैन्याने दाखवून दिले. आमचा विरोध फक्त सैन्याच्या नावावर होणाऱ्या राजकारणाला आहे. राजकारण्यांनी एअर स्ट्राईकचे श्रेय घेणे अत्यंत दुर्दैवी आहे,'' असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी निवडक प्रश्नांना उत्तरे दिली. भारतात उच्चशिक्षित विद्यार्थांनाही अपेक्षेप्रमाणे मोबदला दिला जात नाही या प्रशांचे उत्तर देताना त्यांनी ''आपली विद्यापीठे ही नोकऱ्यांशी जोडली गेलेली नाहीत, त्यामुळे बोरोजगारीचा मुद्दा उपस्थित होतो,'' असे मत व्यक्त केले. ''आपल्याकडे तरुणांच्या कौशल्याला किंमत नाही म्हणून भारत दर दिवसाला 27 हजार नोकऱ्या गमावतो,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.
''तुम्ही मला विचारलेले काही प्रश्न मला आवडणारही नाहीत. मात्र, मी त्यांची उत्तरे देत आहे. माझ्यात तेवढी हिम्मत आहे की मी तुमच्या समोर उभा राहून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे,'' असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे मलिश्का आणि अभिनेता सुबोध भावे यांनी केले.
Web Title: Rahul Gandhi interacts with Students in Pune
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.