नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या उपहासात्मक उल्लेखानंतर भर राज्यसभेत संतप्त झालेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी आता थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलाविलेल्या महत्त्वाच्या बैठकीतच गडगडाटी हास्य केले. यामुळे नाराज झालेल्या राहुल गांधी यांनी बैठकीतील भाषण अर्धवटच सोडले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
'पक्ष सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. यातून सावरण्यासाठी सगळ्याच नेत्यांनी आपापली सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे' अशा आशयावर राहुल गांधी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधत होते. यावेळी रेणुका चौधरी यांना जोरदार हसू आले. त्यांचे गडगडाटी हास्य ऐकून बैठकीस उपस्थित असलेले सर्वच नेते अचानक शांत आणि गंभीर झाले. पक्षाचे अध्यक्ष बोलत असताना अशा स्वरूपाचे वर्तन झाल्यामुळे काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते चौधरी यांच्यावर नाराज झाल्याचेही सांगितले जात आहे.
भाषणात असा व्यत्यय आल्यामुळे राहुल गांधी यांनी भाषण अर्धवट सोडले. त्या बातमीनुसार, राहुल खाली बसले त्यानंतरही चौधरी हसतच होत्या. त्यानंतर काही वेळाने त्यांना ही बाब लक्षात आली. महत्त्वाच्या बैठकीत अशा पद्धतीचे वर्तन केल्यामुळे राहुल गांधीही नाराज झाले असून यापुढील पक्षाच्या बैठकांना चौधरी यांना निमंत्रित केले जाऊ नये, अशा सूचना दिल्या गेल्याचेही सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलत असताना चौधरी यांनी अशाच पद्धतीने व्यत्यय आणला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी तिरकसपणे 'रामायण सीरियलनंतर पहिल्यांदाच असे हास्य ऐकले आहे' अशी टिप्पणी केली. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप घेत प्रचंड गदारोळ घातला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.