मुंबई - राज्यातील ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात कल्याणकारी महामंडळ स्थापण्याची घोषणा सरकारने केली होती; मात्र त्याची अद्याप स्थापना करण्यात आलेली नाही, यासह इतर मागण्यांसाठी रिक्षा संघटना संपावर जाणार आहेत.
रिक्षा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने या संदर्भातील मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे. ज्यामध्ये 8 जुलै रोजी सकारात्मक चर्चा करून मागण्या मान्य झाल्यास, बेमुदत संप टळणार आहे. मात्र, मागण्यांवर सकारात्मक चर्चा न झाल्यास, मुंबई उपनगरांसह राज्यातील रिक्षाचालक संप पुकारणार आहेत. नियमित रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोमवारी मध्यरात्रीपासून त्रास सहन करावा लागणार आहे.
""अनेक महत्त्वाच्या मागण्या अद्यापही सरकारदरबारी प्रलंबित आहेत, त्यांना न्याय मिळावा यासाठी या बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे,'' असे ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटले आहे.
ओला, उबर आणि इतर बेकायदा टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी, तीन वर्षांहून अधिक काळासाठी असलेल्या चालकांनाच बॅच द्यावा, राज्यातील रिक्षाचे मुक्त परवाने बंद करावेत, हकीम कमिटीच्या शिफारशी तंतोतंत लागू करण्यात याव्यात आदी मागण्या रिक्षा चालक मालक संघटनांनी केल्या आहेत.
Web Title: Rickshaw driver strike from midnight today
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.