स्वाभिमानी शेतकरी पक्ष राज्यातल्या ४९ जागा लढविणार; राजू शेट्टी यांची पत्रकार परिषदेत माहिती

स्वाभिमानी शेतकरी पक्ष राज्यातल्या ४९ जागा लढविणार; राजू शेट्टी यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे - ‘विधानसभेची निवडणूक महाआघाडीतून लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र, ४९ जागांवर निवडणूक लढविणार आहे,’’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

‘विधानसभेची निवडणूक मी लढणार नसून पक्षाच्या सक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल,’’ असे सांगून त्यांनी निवडणूक लढविण्याच्या विषयावर पडदा टाकला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, दशरथ सावंत, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह सदस्य उपस्थित होते. पुणे येथील मराठा क्रांती मोर्चाच्या पूजा झोळ यांच्यासह ६० हून अधिक तरुणांनी स्वाभिमानी युवा आघाडीत प्रवेश केला. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या सूत्रानुसार हमीभाव जाहीर करावा. महाराष्ट्राचा कृषी क्षेत्राचा आर्थिक विकास दर उणे आठ टक्के झाला आहे. शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने विनाअट सरसकट सातबारा कोरा करून शेतीचे वीजबिल माफ करावे. दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यातील पीकविमा भरणा केलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याची जोखीम रक्कम तत्काळ द्यावी. २० जुलैपूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना खरिपासाठी पीककर्ज देण्यास बॅंकांना आदेश द्यावेत, आदी ठराव मंजूर केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com