चहावाला ते पंतप्रधान! कसे झाले मोदी भारताचे चौकीदार..!

चहावाला ते पंतप्रधान! कसे झाले मोदी भारताचे चौकीदार..!

भारतीय राजकारणात 2014 हे वर्ष कधीच विसरले जाण्यासारखे नाही, त्याला कारणही तसेच आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीची (यूपीए) दहा वर्षांची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर केला अन् बघता बघता देशभर हाच चेहरा देशाचे भविष्य आहे असे वातावरण तयार झाले. आजच्याच दिवशी म्हणजे (16 मे) भारताचा 14 पंतप्रधान हे नरेंद्र मोदी असतील हे निश्चित झाले.

2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन यासारख्या दिग्गजांना बाजूला सारून काँग्रेसने यूपीएची स्थापना करून सत्ता मिळविली होती. डॉ. मनमोहनसिंग यांच्या गळात पंतप्रधानपदाची माळ पडल्यानंतर त्यांनी सलग दहा वर्षे पंतप्रधानपद सांभाळले होते. या काळात भाजपकडे ज्येष्ठ नेत्यांशिवाय आक्रमक असा चेहरा कोणताही नव्हता. मात्र, 2013 च्या अखेरीस भाजपने मोदी अस्त्र बाहेर काढत निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसपुढे मोठे आव्हान निर्माण केले. गोव्यात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने 2014 साठी मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हे जाहीर करून काँग्रेसला तेथेच मात दिली. मोदी यांनी नंतर काँग्रेसला सरकारला धारेवर धरत विविध घोटाळे, सोशल मीडियाचा वापर आणि विकास या विषयांवर जोरदार प्रचार केला. मोदींच्या सभांना देशभरात मिळणारा प्रतिसाद पाहून देशात मोदी लाट असल्याचे स्पष्ट झाले. याचे रुपांतर थेट मतांमध्ये होऊन देशभरात भाजपला एकहाती सत्ता स्थापन करता येईल एवढ्या 282 जागा मिळाल्या. 1984 नंतर प्रथमच एखाद्या पक्षाला एवढ्या जागा जिंकता आल्या होत्या. भाजपने मित्रपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मोदींची या निवडणुकीच्या निमित्ताने विकासपुरुष अशी छबी समोर आली. 

चहावाला ते पंतप्रधान असा टप्पा गाठलेल्या मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद अनेक वर्षे भूषविले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जडणघडणीत वाढलेल्या मोदींना देशच माझ्यासाठी सर्वकाही असल्याचे अनेकवेळा सांगितले. गुजरातमधील गोध्रा दंगलीप्रकरणी मोदींना जबाबदार धरण्यात आले होते, पण यातून ते निर्दोष सुटले. मोदींच्या कारकिर्दीत अनेक घटना घडल्या. त्यांच्या कट्टर हिंदुत्वाबद्दलही अद्याप प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मात्र, गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळावर नजर टाकली तर अनेक मुद्द्यांपासून त्यांचे राजकारण भटकलेले दिसते. विकास, बरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योगांची वाताहत, राफेलचे आरोप यांना मोदींना सामोरे जावे लागले. तरीही भाजपमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करून मोदींनी पंतप्रधानपदासाठी आपणच कसे सक्षम असल्याचे सतत दाखवून दिले आहे. विरोधकांना लक्ष्य करणारे मोदी मात्र आता याचा सोशल मीडियाचा बळी ठरत आहेत. त्यांना 2014 मध्ये केलेली वक्तव्ये आणि त्यांची आश्वासने विरोधकांकडून त्यांना आरसा म्हणून दाखवून दिली जात आहेत. या सर्वांतून मोदी कसे तरतात हेच आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी (23 मे) समोर येणार आहे.

पाच वर्षांमध्ये भारताच्या राजकारणामधील चित्र नक्कीच बदलले आहे. मोदींचा करिष्मा पूर्णणे संपला नाही, हे खरे असले; तरीही राहुल गांधी यांनी नव्याने आक्रमक धोरण स्वीकारत सत्ताधारी भाजपच्या प्रचारयंत्रणेला धक्का दिला, हेही वास्तव आहे. 'राहुल गांधी 2.0' भाजपला रोखू शकतील का? की मोदी लाटेचा 'अंडरकरंट' पुन्हा एकदा राजकीय विश्‍लेषकांना तोंडघशी पाडणार? 

आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय मतदाराने त्याचा कौल दिला आहे. आता देशातील शेवटच्या काही मतदारसंघांमधील मतदान शिल्लक आहे. भारतीय जनतेचा निर्णय जवळपास ठरला आहे. तो कळेल आता पुढच्या आठवड्यात.. 23 मे रोजी! पुन्हा मोदी निवडून येणार की बदललेले राहुल गांधी भाजपला धक्का देणार? कळेलच काही दिवसांमध्ये.. 

Web Title : marathi news from a tea seller to PM how narendra modi became chowkidar of india 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com