नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावर टीका केल्याप्रकरणी मणिपूरच्या एका पत्रकाराची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. किशोरचंद्र वांगखेम असे या पत्रकाराचे नाव असून, त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची शिक्षा मंगळवारी (ता. 18) सुनावण्यात आली आहे.
किशोरचंद्र वांगखेम यांना 21 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी पश्चिम इंफाळमधील न्यायालयाने त्यांना 70 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. जामीन देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असेही स्पष्ट केले होते. परंतु, ही सुटका झाल्यानंतर रासुकाच्या सल्लागार मंडळाने किशोरचंद्र यांना पुन्हा एका वर्षासाठी ताब्यात घेण्यावर शिक्कामोर्तब केले. कारण, या पत्रकाराचा इतिहास बघता, तो पुन्हा आक्षेपार्ह वर्तणूक करेल आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत होईल, त्यामुळे रासुका कायद्याच्या 13व्या कलमाअंतर्गत त्यांना बारा महिन्यांपर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवणे योग्य ठरेल’.
दरम्यान, भारतीय पत्रकार संघ आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाने किशोरचंद्र यांच्या अटकेचा निषेध केला आहे. रासुका हा कायदा अत्यंत मागास असून अन्यायकारक असल्याचे मत यापूर्वीही अनेक सामाजिक संस्थांनी व्यक्त केले आहे. किशोरचंद्र यांचे कुटुंबीय त्यांच्या शिक्षेला आव्हान देण्याची शक्यता आहे. रासुकाच्या सल्लागार मंडळाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत मणीपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनीही या निर्णयावर सही केली असून, किशोरचंद्र यांच्या या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किशोरचंद्र वांगखेम (वय 39) यांनी फेसबुकवर एका व्हिडीओच्या माध्यमातून मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या व्हिडीओमध्ये त्यांनी हे राज्यसरकार झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करत असल्याचे मला दुःख होतेय आणि मी तितकाच हैराण आहे. कारण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा मणिपूरशी काहीही संबंध नाही, त्यांनी मणीपूरसाठी काहीच केलेले नाही. तरीही त्यांच्या जयंतीनिमित्त मणिपूरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, कारण मुख्यमंत्री बीरेन सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसच्या हातातील बाहुले आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. शिवाय, किशोरचंद्र वांगखेम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्यावर अवमानकारक शब्दांचा वापर केला होता.
Web Title: Manipur Journalist Jailed Under NSA for Criticising Narendra Modi BJP-Led Manipur Govt
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.