हताश शेतकऱ्याचे पाऊल; ‘करपा’मुळे केळी रोपे उपटून फेकली

हताश शेतकऱ्याचे पाऊल; ‘करपा’मुळे केळी रोपे उपटून फेकली
banana crop
banana crop

रावेर (जळगाव) : खिर्डी खुर्द (ता. रावेर) येथे सुमारे चार लाख रुपये खर्च करून लावलेल्या केळीवर ‘करपा’ पडल्यामुळे साडेसहा हजार केळी रोपे अल्पभूधारक शेतकऱ्याने नाइलाजाने उपटून फेकून दिली. निकृष्ट दर्जाची टिश्यू कल्चर रोपे विकणाऱ्याविरुद्ध कृषी विभागाने धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

banana crop
मजूरांची गाडी पलटली; तीन जण जागीच ठार

सध्या ढगाळ हवामानामुळे आणि मधून मधून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील केळीवर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्याच्या निर्मूलनासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांना औषधी फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खिर्डी खुर्द येथील अल्पभूधारक केळी उत्पादक शेतकरी ज्ञानदेव इंगळे यांच्यावर या वर्षी आभाळच कोसळले आहे. त्यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धतीची फक्त दोन एकर शेती आहे. त्यांच्याकडे फक्त दोन बिघे जमीन येते. इंगळे कुटुंब त्यांच्या हेमंत या मुलासह अन्य शेतकऱ्यांची शेतजमीन नफ्याने करून आपला उदरनिर्वाह कसाबसा चालवितात.

चार लाख रूपये खर्च

शेतकरी इंगळे यांनी सावदा येथील एका खासगी नर्सरीमधून केळीची ६,५०० टिश्यू कल्चर रोपे प्रत्येकी ८ रुपयाला विकत घेतली. लागवडीनंतर काही दिवसांनी रोपांवर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसायला लागला. त्यांनी विक्रेत्याला त्याबाबत सांगितले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्या विक्रेत्याचे अपघाती निधन झाल्याचे ज्ञानदेव इंगळे यांचा मुलगा हेमंत याने सांगितले. केळीसाठी त्यांनी सुमारे सव्वा लाख रुपये नफा दुसऱ्या शेतकऱ्याला आधीच दिला असून, ५२ हजार रुपयांची रोपे खरेदी केली होती. त्यांच्या स्वतःच्या शेतातून जलवाहिनी आणल्याचा आणि वीजबिलाचा खर्चही मोठा होता. करपा पडल्यानंतर तीन-चार वेळेस औषध फवारणी केली. असे सर्व मिळून सुमारे चार लाख रुपये खर्च झाले. मात्र, हाती काहीही आले नाही. यामुळे इंगळे कुटुंब हताश झाले आहे.

अखेर केळी कापून काढली

ढगाळ हवामान आणि रोपांमधील दोषामुळे मोठ्या प्रमाणावर केळीची पाने वाळली. प्रत्येक झाडावर केवळ दोन- तीन पाने हिरवी शिल्लक होती. लागवड करून साडेसहा महिने झाले, तरी केळीला केळ फुल (कंबळ) आले नव्हते. केळीची उंचीही वाढत नव्हती. अखेर ज्ञानदेव इंगळे, त्यांच्या पत्नी, मुलगा हेमंत इंगळे आणि कुटुंबातील सदस्यांनी केळी जड अंतःकरणाने कापून काढली.

करपा निर्मूलन योजना बंद

तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारने सुमारे ९० कोटी रुपये अनुदानाची केळी करपा निर्मूलन योजना १२ वर्षांपूर्वी सुरू केली होती. या योजनेत केळी उत्पादक शेतकऱ्यांना निम्म्या दरात करपा निर्मूलनाची औषधे कृषी विभागाकडून मिळत असतं. मात्र, सात ते आठ वर्षांपासून या योजनेतील निम्मे अनुदान शिल्लक असूनही योजना बंद झाली आहे. खासदार रक्षा खडसे यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी केळी उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com