#साम_MPSCपरिषद । स्वीकार हेच सत्य : प्लॅन बी

कोरोनानंतर बेरोजगारीची जी परिस्थिती निर्माण झाली त्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा विद्यार्थी प्रचंड प्रमाणात भरडला गेला. आता पुढे काय या प्रश्नाचे उत्तर शोधताना प्लॅन बी चे महत्व त्याला समजले.
#साम_MPSCपरिषद । स्वीकार हेच सत्य : प्लॅन बी
#साम_MPSCपरिषद । स्वीकार हेच सत्य : प्लॅन बीSaamTvNews

~ राजकुमार देशमुख

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या अडचणींना वाचा फुटली. या अडचणी नवीन आहेत का? तर, मुळीच नाहीत. मात्र, कोरोनानंतर बेरोजगारीची जी परिस्थिती निर्माण झाली त्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा विद्यार्थी प्रचंड प्रमाणात भरडला गेला. आता पुढे काय या प्रश्नाचे उत्तर शोधताना प्लॅन बी चे महत्व त्याला समजले.

मुळातच प्रत्येक माणूस, प्रत्येक विद्यार्थी आपल्या यशासाठी झटत असतो, प्रयत्न करत असतो. प्रत्येक विद्यार्थी हाच विचार करत असतो की, बाकीच्यांना जमले नाही याचा अर्थ असा नाही की मला ही जमणार नाही, मी जास्त अभ्यास करेन, जास्त पुस्तके वाचेल आणि पदवीस्तर स्पर्धा परीक्षा यशस्वी होईल, बाकीच्यांनी केलेल्या चुका मी करणार नाही आणि यशस्वी होईल. या विचारात ऐन उमेदीची पाच वर्षे कशी निघून जातात हे समजत पण नाही. या सर्व प्रक्रियेत यश मिळाले तर ठीक पण जेव्हा विद्यार्थी अपयशाचे धक्के खातो तेव्हा एक मानसिकता तयार होते. “खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी” आता मी माझ्या आयुष्याची उमेदीची 5-7 वर्ष स्पर्धा परीक्षेत वाया घालवलेली आहेत. माझ्या गावाच्या पंचक्रोशीत सर्वांनाच माहित आहे की हा मुलगा भावी तहसीलदार आहे, भावी PSI आहे आणि हेच ती गावच्या पारावर बसणारी लोक ज्याचें विद्यार्थी अनाहूतपणे टेन्शन घेतो आणि स्वतः स्वतःची एक व्याख्या बनवतो.

आता इथून मागे फिरलो तर मी अपयशी ही सर्व लोक मला अपयशी समजतील आयुष्यात वयाच्या तिसाव्या वर्षीच मी काहीच करु शकलो नाही असं समजतील आणि आयुष्यभरासाठी अपयशाचा शिक्का लावतील म्हणून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या वर्तुळात फिरत राहतो. मग कधी आणि कुठल्या टप्प्यावर ठरवायचा प्लॅन बी ?

हे देखील पहा :

काही विद्यार्थी वयाचे किंवा किती वेळा परीक्षा द्यायची याचे स्वतःला बंधन घालतात ते प्लॅन बी कडे आत्मविश्वासाने वळतात आणि मग स्पर्धा परीक्षेलाच प्लॅन बी ठरवून अर्थाजनाचे साधन सुरू करतात. परंतु ज्यांना कुठं थांबायचं हे लक्षात येत नाही ते मात्र या स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात वाहत जातात. अशा विद्यार्थ्यांना बूस्टर डोस देण्याचे काम करीत असतात ते खाजगी क्लास वाले. तो त्यांचा व्यवसाय आहे. परंतू, विद्यार्थ्यांला स्वतःहून कुठे थांबायचे हे उमगायला होते, तेवढ्यातच 'पंख होनेसे कुछ नही होता, हौसलें से उडान होती है' हा विश्वास नांगरे पाटलांचा डायलॉग कानावर पडतो आणि पुढचा शेवटचा प्रयत्न म्हणून दोन वर्षांसाठी बॅटरी आणखी एकदा चार्ज होते, ज्याने सद्यस्थिती बदलणारी नसते.

पुढे जाऊन दुसरी बाजू पहिली असता या विषयाला दिरंगाईची प्रशासन व्यवस्था सुद्धा हातभार लावत असते. वर्षापूर्वी परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यापासून ते अंतिम नियुक्त्या देण्यापर्यंतची प्रक्रिया ठरलेल्या वेळेत पूर्ण होताना अलीकडच्या काळात दिसत नाही. मग प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करण्याची वेळ ही विद्यार्थ्यांवर येते. या दोन वर्षात तर कोरोना, आरक्षण बदल यामुळे याचे प्रमाण खूपच वाढले.

#साम_MPSCपरिषद । स्वीकार हेच सत्य : प्लॅन बी
जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या : एकनाथ शिंदे

परवा एका विद्यार्थ्याला प्लॅन बी बाबत विचारणा केली असता तो सांगत होता '२०१७ साली एमपीएससीची सहायक मोटार वाहन निरीक्षक या ८३२ पदांसाठी परीक्षा दिली. कोर्ट आणि समांतर आरक्षण प्रकरणामुळे सुधारित अंतिम निकाल सप्टेंबर २०१९ मध्ये लागला. निकाल उशिरा का होईना पण लागला म्हणून सुटकेचा निःश्वास सोडला. नियुक्तीप्रक्रिया सुद्धा लगेच सुरू झाली मात्र पुन्हा मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू झाल्याने नियुक्तीप्रक्रिया थांबली, त्यात ४७ नियुक्त्या अजून पूर्ण होणे बाकी होते. मात्र पुन्हा अनलॉक झाल्यानंतर उर्वरित नियुक्त्या मिळणे अपेक्षित असताना २०२१ संपत आले तरी अजूनही नियुक्त्या हाती मिळाल्या नाहीत. नियुक्त्यांसाठी मंत्रालयाचे हेलपाटे, मंत्र्यांना निवेदने यासाठी वेळ खर्ची करावा लागत आहे. मग परीक्षा पास होऊनही नियुक्त्या मिळत नसतील तर परीक्षा द्यायची कशासाठी??

असा उद्विग्न सवाल त्याने केला. त्यामुळे प्लॅन बी हा विद्यार्थ्यांसाठी जेवढा तेवढेच प्रशासनाने सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न हे तातडीने सोडवायला हवेत. शेवटी विद्यार्थ्याने स्वतः चे आत्मपरीक्षण करून आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यातून मार्ग हेच अंतिम सत्य आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com