नाशिक: त्रिपुरा घटनेचे पडसाद महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये उमटले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही काही प्रमाणात हिंसाचार झाला. मात्र सुदैवानं पोलीस आणि प्रशासनानं वेळीचं खबरदारी घेतल्यानं परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीचं शहरात शांतता प्रस्थापित करण्यात आल्यानं पुढील अनर्थ टळला. मात्र हिंसाचाराच्या घटनेच्या मुळाशी गेल्यावर पोलीस तपासात आता अतिशय गंभीर बाबी समोर येता आहेत. हिंसाचारादरम्यान जमावाला चिथावणीखोर घोषणा देऊन भडकवण्यात आल्याचं तपासात समोर आलं असून हे सर्व पुरावे पोलिसांकडून कोर्टात सादर केले जाणार आहेत.
त्रिपुरा हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी मालेगावात रझा अकॅडमीकडून बंद पुकारण्यात आल्यानंतर मालेगावात हिंसाचार उफाळला. जमावाने हिंसक होत रस्त्यावर उतरून एसटी बसस्थानक, एटीएम, हॉस्पिटलसह अनेक ठिकाणी दगडफेक आणि तोडफोड केली. यावेळी जमावाने पोलिसांवरही दगडफेक करून हल्ला केला. हिंसक जमाव शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांनी वेळीचं परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानं पुढील अनर्थ टळला. मात्र ज्या त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ बंद पाळला गेला आणि हिंसाचार झाला, त्या त्रिपुरात नेमकं काय घडलं? त्रिपुरा कुठे आहे? याची माहितीही दगडफेक करणाऱ्यांना नसल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय. त्यामुळे हिंसाचारासाठी चिथावणीखोर घोषणाबाजी करून जमावाला भडकवण्यात आल्याचा संशय पोलिसांना असून पोलिसांच्या तपासात अनेक महत्वपूर्ण बाबी समोर आल्यात.
मालेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 5 वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून बंद आणि मोर्चाचं आयोजन करणाऱ्या रझा अकॅडमीच्या आयोजकांवरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे हिंसाचारप्रकरणी आत्तापर्यंत 45 जणांना अटक करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे पोलिसांनी रझा अकॅडमीच्या मालेगातील कार्यालयावर छापा टाकून झाडाझडती घेतली. यावेळी संगणक, धार्मिक पुस्तकं, काही व्हिडिओ असे हिंसाचारासंबधी महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. हे सर्व पुरावे कोर्टासमोर सादर करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हिंसक झालेला तरुणांचा जमाव कोणाच्या सांगण्यावरून रॅलीत सहभागी झाला, त्यांना कुणी घोषणाबाजी करायला सांगितलं, त्यांना दगडफेक करायला कुणी प्रवृत्त केलं. या सर्व प्रश्नांची उकल पोलीस सध्या करत असून समोर येणाऱ्या पुराव्यांवरून दगडफेक आणि हिंसाचाराचे मास्टरमाईंड चेहरे लवकरच उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. त्यामुळे आता या चौकशीअंती नेमकं काय सत्य समोर येतंय, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
- मालेगाव हिंसाचारात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचं 11 लाख 12 हजार रुपयांचं नुकसान
- नवीन बस स्थानकाचं 3 लाख 71 हजार, एटीएमचं 37 हजार, रुग्णालयाचं 30 हजार यासह खासगी व्यक्ती असा एकूण 9 जणांच्या मालमत्तेचं 11 लाख 12 हजार रुपयांचं नुकसान
त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात जाणीवपूर्वक हिंसाचार घडवण्यात आल्याचे आरोप-प्रत्यारोप होत असतांनाचं गेल्या काही वर्षांपासून शांत असणाऱ्या मालेगावला त्रिपुरा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अशांत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे दंगल घडवण्यामागे काही राजकीय पक्षांच्या लोकांचा हात असल्याचा दावाही मालेगाव मध्य विधानसभेचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केला आहे, तर पोलीस तपासातही याचं अनुषंगाने काही महत्वपूर्ण बाबी समोर आल्यानं मालेगावातील हिंसाचारावरून आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मालेगावमधील हिंसाचारानंतर आता शहरात शांतता असली, तरी या हिंसाचाराच्या घटनेनं अनेक वर्षांपासून शांत असलेलं मालेगाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्रिपुरातील घटनेचं भांडवल करून काही समाजविघातक प्रवृत्तींनी जाणीवपूर्वक प्लॅनिंग करून मालेगावात हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. मालेगावात ज्या ठिकाणी दगडफेक झाली, त्या ठिकाणी आधी दगड नव्हते, तर रात्रीतून तिथे दगड ठेवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे मालेगाव मध्य विधानसभेचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी हा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे.
त्रिपुरातील घटनेनंतर मालेगावमध्ये राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकानं कॉर्नर मिटिंग घेतली होती. त्यावेळी पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र आता 8 दिवसांनी हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली. त्यामुळे 8 दिवसांपूर्वीचं कारवाई केली असती, तर दंगल घडली घडली नसती, असं सांगत दंगल घडवण्यामागे नेमकं कोण आहे? याचा शोध यंत्रणांनी घ्यावा, असं मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी म्हटलंय.
मालेगाव हिंसाचार प्रकरणी आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचल यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रिपुरा घटनेशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तो हलचल यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता, असं आता पोलीस तपासात समोर आलं आहे. आता या सर्व प्रकारची चौकशी पोलिसांकडून सुरू असली, तरी 2001 ची दंगल, 2006 आणि 2008 च्या बॉम्बस्फोटांनंतरही शांत असणाऱ्या मालेगावला खरंच जाणीवपूर्वक अशांत करण्याचा प्रयत्न झालाय का? काही राजकिय पक्षांच्या लोकांकडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होतोय का? याच्या मुळाशी जाऊन तपास होणं अतिशय गरजेचं असून सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई होण्याची गरज आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.