
काँग्रेसची पारंपरिक लढत विरुद्ध भाजपची अत्याधुनिक यंत्रणा याला पहिल्यांदाच काँग्रेसने कर्नाटकात छेद दिला. ९ महिन्यांपासून एक केंद्रीय वॉररूम स्थापन करून राबवलेली यंत्रणा या विजयात महत्वाची ठरली. आणि दुसरा गेमचेंजर ठरला तो म्हणजे थेट कार्यकर्त्यांबरोबर सातत्याने ठेवलेला संवाद.
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस आज विजयाचा जल्लोष करत आहे. पण या निमित्ताने पहिल्यांदाच बदललेली काँग्रेस पाहायला मिळाली. आणि यासाठी कारणीभूत ठरली ती काँग्रेसने राबवलेली आधुनिक यंत्रणा. कर्नाटक निवडणूक जाहीर होणाच्या अनेक महिने आधीच या सगळ्याची तयारी सुरू झाली होती. (Latest Marathi News)
माजी आयएएस अधिकारी शशिकांत सेंथिल यांना कर्नाटक निवडणुकीसाठी संपूर्ण अत्याधुनिक यंत्रणा राबवण्याची जबाबदारी देण्यात आली. आणि इथून सुरुवात झाली ती बदललेल्या काँग्रेसची. या यंत्रणेत पहिल्यांदा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना सहभागी करून घेण्यात आलं. ही तज्ज्ञमंडळी अशी होती; ज्यांना थेट राजकारणात किंवा कुठल्याही पक्षाशी स्वत:ला जोडून घ्यायचं नव्हतं. पण विचारसरणीच्या दृष्टीने मदत मात्र करायची होती.
त्यांच्या सहभागानंतर पहिलं काम केलं गेलं ते म्हणजे विविध मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद. ग्राउंड यंत्रणा असणाऱ्या काँग्रेसमध्ये नेत्यांच्या पलीकडे जाणं तसं सहसा होत नाही. पण इथे मात्र नेत्यांच्या ऐवजी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्यात आला. सहाजिकच याचा फायदा झाला, तो कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी. ही ग्राऊंड लेव्हलची 'मशिनरी' काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरली गेली आणि सहाजिकच त्याचा फायदाही पक्षाला झाला.
एरवी कांग्रेस म्हटलं की नेत्यांमधली भांडणं, हेवेदावे, गटबाजी हे ओघाने येतंच. पण यावेळी काँग्रेसने जाणीवपूर्वक सर्व नेतृत्व एक असल्याचा संदेश दिला. वरची फळी म्हणजे कर्नाटकसाठी जबाबदार असणारे खरगे, शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना तर एकत्र आणलं गेलंच; पण याच्या बरोबरीने कुठेही स्थानिक पातळीवर काही भांडणं, वाद असतील तर त्यात लक्ष घालून संवाद साधून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला गेला.
दुसरं महत्वाचं धोरण ठरवण्यात आलं ते म्हणजे भाजपने ऐरणीवर आणलेल्या कोणत्याही मुद्यांना काँग्रेसने प्रत्युत्तर न देणं. या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी असणारा एक नेता 'साम'शी बोलताना म्हणाला, “भाजपने टीपू सुलतानपासून ते बजरंगबलीच्या घोषणेपर्यंत अनेक मुद्दे संपूर्ण निवडणुकीत आणले. पण कुठेही त्याला बळी पडायचं नाही, हे धोरण ट्रेनिंगपासूनच्या प्रत्येक पावलावर ठसवलं जात होतं. दोनच मुद्दे भ्रष्टाचार आणि विकास हे काँग्रेसच्या अजेंड्यावर होते. आणि शेवटपर्यंत त्याच मुद्द्यांवर राहण्यात पक्ष यशस्वी ठरला.
अर्थात यात महत्वाची भूमिका बजावली ती कार्यकर्त्यांबरोबरच्या संवादानेच. कोण काय प्रतिक्रिया देतंय यापासून ते कोण कसं काम करतंय या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवली जात होती. त्यावर वेळोवेळी उपाय केले जात होते. उदाहरणार्थ कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने भ्रष्टाचारावर पत्र लिहिलं आणि मग काँग्रेसने आपला प्रचार त्याच मुद्द्याभोवती गुंफला. पे टु सीएम हे कॅम्पेन यशस्वी झाले.”
याच्या बरोबरीनेच प्रत्येक स्थानिक भागासाठी महत्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर काँग्रेस काम करत गेलं. राज्याचे पाच भाग करून त्या प्रत्येक भागासाठी माँनिटरींगसाठी एक टीम नेमली गेली. आणि त्यातून २४ तास २२३ उमेदवारांशी आणि इलेक्शन एजंट्सशी संपर्क ठेवला गेला. इव्हीएमबाबत ट्रेनिंग देण्यापासून सुरू झालेला हा या यंत्रणेचा प्रवास अगदी मुद्द्यांवरून न हटण्यापर्यंत झाला. आणि दर पाच वर्षांनी सरकार बदलणाऱ्या कर्नाटकात यंदा काँग्रेसला लोकांनी आशिर्वाद दिला तो त्यांचं आजपर्यंतचं सर्वाधिक मताधिक्य देऊन.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.