
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या ५ जूनला उत्तर प्रदेशात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र परप्रांतीयांबाबत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विरोध होत आहे. अशात मनसेच्या नेत्यानं थेट परप्रांतीयांचंच कौतुक केलं आहे. "मुंबईच्या विकासात परप्रांतीयांचंही योगदान आहे" असं वक्तव्य मनसेचे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी केलंय. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि मगच उत्तर प्रदेशला (Ayodhya) यावे अशी अट भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह (BJP MP Brij Bhushan Sharan Singh) यांनी घातली आहे. त्यांच्या याच आवाहनाला यशवंत किल्लेदार यांनी उत्तर देताना परप्रांतीयांचं कौतुक केलं आहे. यामुळे परप्रांतीयांबाबत मनसे आपली भूमिका बदलतेय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. (MNS Is Becoming a Soft For Non-Maharashtrian Peoples?)
हे देखील पाहा -
मुंबईच्या विकासात परप्रांतीयांचंही योगदान असल्याचा मनसेचा दावा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतल्यामुळे मनसेनं भूमिका कशी बदलली अशी चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे, मुंबईचा विकास हा भुमिपुत्रांमुळे झालाय आणि मेट्रो सिटी असल्यामुळे परप्रांतींयाचे सुद्धा यामध्ये योगदान आहे' असा दावाच मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला आहे. मात्र मनसेच्या स्थापनेपासूनचा इतिहास पाहता मनसेने परप्रांतीयांबाबत कठोर भूमिका घेत अनेकदा तीव्र आंदोलनं केली आहेत. परप्रांतीयांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्याची मनसेची भूमिका असल्यामुळे मनसे विरुद्ध परप्रांतीय असं चित्र पाहायला मिळालं आहे. राज ठाकरेंनी खासकरून उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या लोकांना मनसेने सर्वात जास्त विरोध केला आहे. मात्र आता हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे मनसे परप्रांतीयांच्या बाबतीत मवाळ झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु
हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन राज ठाकरेंनी राज्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत आंदोलन केल्यानंतर आता मोर्चा अयोध्येकडे वळवला आहे. राज ठाकरे शेकडो पदाधिकाऱ्यांसह येत्या पाच जूनला अयोध्येत जाणार आहे. मनसेचं शिष्टमंडळ पुढील आठवड्यात अयोध्येला आढावा घेण्यासाठी जाणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने अयोध्या आणि शरयू नदीच्या काठी मनसे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि राज्यातील इतर ठिकाणाहून मनसैनिक अयोध्येत दाखल होणार आहेत. यासाठी मनसेकडून ट्रेनची तिकीटं बुक करण्यात येत आहेत.
राज ठाकरेंना अयोध्येत विरोध
एकीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु आहे तर दुसरीकडे राज ठाकरेंना अयोध्येत येण्यास विरोध होत आहे. राज ठाकरेंनी पूर्वी परप्रांतीयांबद्दल खासकरून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. याबाबत राज ठाकरेंनी जाहिर माफी मागावी आणि मग अयोध्योत यावे. अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवून देणार नाही अशी अट भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी घातली आहे. त्यांच्या या आव्हानाला यशवंत किल्लेदार यांनी उत्तर देतानाच परप्रांतीयांचं कौतुक केलं आहे. त्यामुळे परप्रांतीयांबात मनसे मवाळ होतेय का असा प्रश्न उपस्थित होतोय.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.