BLOG : सलोख्याचे प्रदेश : हिंदू मुस्लिमांमधील एकोपा जपणारा भारत
प्राची कुलकर्णी
त्र्यंबकेश्वर मधला वाद, गेल्या काही काळात राज्यात वेगवेगळ्या भागात झालेल्या दंगली यातून हिंदू मुस्लिमांमधलं अंतर वाढतंय का? याची भिती वाटते. पण मुळचा भारत असा आहे का असा विचार केला तर त्याचं उत्तर येतं नाही हेच. हिंदू देवतांची भक्ती करणारे मुस्लीम असो की दोन्ही धर्मांचं पालन करणारी माणसं. सर्वधर्मसमभावाची अनेक उदाहरणं देशात पहायला मिळतात. याच उदाहरणांचं सध्याचा काळात प्रत्येकानेच वाचलं पाहिजे असं पुस्तक म्हणजे सलोख्याचे प्रदेश.
सबा नक्वी पत्रकार म्हणून काम करत असतानाच बाबरी मशीद पाडली गेली. बाबरी नंतर सलोखाच्या कहाण्या लिहिल्या जात होत्या आणि अशाच एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला गेला की तुम्ही आणि तुमचे पती हिंदु मुस्लीम आहात तर बाबरीच्या प्रश्नावरुन तुमच्यामध्ये वाद होतात का? या प्रश्नाचा म्हणावं तर तिटकारा यावा. पण त्यांना मात्र या प्रश्नाने कामाला लावलं. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि जेएनयूमधल्या प्राध्यापकांकडून आर्थिक सहाय्य घेत त्या बाहेर पडल्या ते देशभ्रमंती करायला. त्यांना शोध घ्यायचा होता तो अशा भागांचा एकजूटीच्या खुणा सापडतील. या प्रवासात त्यांना सापडले ते हे सलोख्याचे प्रदेश. (Latest Marathi News)
या प्रवासात त्यांना भेटली ती अशी माणसं जी एकाच वेळी हिंदू आहेत आणि मुस्लिम सुद्धा. पश्चिम बंगाल मध्ये असं अख्खं गावच दोन धर्मांची ओळख घेत गुण्यागोविंदाने नांदतय. पटचित्रका समाजाचं हे गाव आणि त्यातले लोक आडनाव लावतात ते फक्त चित्रकार हेच. अर्थात दोन्ही धर्मांच्या ओळखी जपत हिंदू देवतांची चित्र काढण्याची आपली कला जपणाऱ्या या माणसांनाही आपली ‘ओळख’ सिद्ध करावी लागतेच. (Marathi News)
पश्चिम बंगालमधल्या याच प्रवासात त्यांना बोनबीबीदेवीची पूजा करणारी लोकं भेटली. सुंदरबनचं रक्षण करणारी देवी म्हणून जिला मानलं जातं ती ही देवी आहे एक मुस्लीम देवता. एकीकडे बंगालच्या या कहाण्या तर दुसरीकडे भगवान विष्णूची मुस्लीम सखी असं काही म्हणलं तरी आपल्याकडे कपाळावर आठ्या आणि तोंडावर काहीही काय चे भाव येतील. पण तमिळनाडूतल्या त्रिचीमधल्या श्रीरंगम मंदिरात मात्र ही परंपरा पाळली जाते. या झाल्या भारतातल्याच दुरच्या राज्यांमधल्या कथा.
पण आपल्या महाराष्ट्रातही ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेतानाही आवेश येतो त्या शिवाजी महाराजांचे सुफी संतांबरोबर असलेले उत्तम संबंध. संशोधकांच्या मते मालोजीराजेंची शाह शरीफ या नगर जिल्ह्यातल्या संतांवर श्रद्धा होती. आणि त्यांनी आपल्याला मुलं व्हावी यासाठी त्यांचे आशीर्वादही घेतले होते. स्वत: शिवाजी महाराज देखील सुफी संत सय्यद याकूब यांना मानक असत आणि त्यांचा सल्लाही घेत असत असं सांगितलं जातं.
या झाल्या नक्वी यांनी लिहिलेल्या काही कहाण्या. अशा अनेक इतिहास आणि वर्तमानही सांगणाऱ्या अनेक कथा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला अनुवादासाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती समकालीन प्रकाशन घेऊन आलं आहे. सध्याच्या वातावरणात सहिष्णू भारताचा शोध घेणारं सलोख्याचे प्रदेश शोधणारं हे पुस्तक वाचायलाच हवं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.