सावधान | आज रात्री धडकणार  निसर्ग वादळ

सावधान | आज रात्री धडकणार निसर्ग वादळ


मुंबई : अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाच्या पट्ट्याचे आज, मंगळवारी पहाटे ५.३०च्या सुमारास चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. निसर्ग चक्रीवादळ रात्री ११.३०पर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. त्यानंतर ३ जूनला रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दमणदरम्यानच्या पट्ट्यात त्याचा जमिनीवर प्रवेश होईल. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळामुळे नुकसान होऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तवला. एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. मान्सूनचे दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन पूर्वानुमान सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले, त्यावेळी या चक्रीवादळाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली.केरळमध्ये दाखल झालेला मान्सून व मुंबईसह काही उपनगरांत पावसाने सोमवारी दिलेल्या सलामीमुळे जनमानस सुखावले असले तरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काळजीचेही वातावरण निर्माण झाले आहे.

 एखाद्या ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊसही पडू शकेल. ४ जून रोजीही उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस चक्रीवादळामुळे आलेला असेल. हा मान्सूनचा पाऊस नसेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. चक्रीवादळानंतर काही दिवसांच्या विलंबाने मान्सूनचा प्रवास पुढे सुरू होईल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. आज, मंगळवारी हाटे ते उत्तरेकडे सरकेल आणि त्यानंतर त्याचा प्रवास ईशान्येकडे होणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे २ आणि ३ जून रोजी दक्षिण कोकण आणि गोवा येथे बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ३ जून रोजी उत्तर कोकणामध्ये तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


 महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवरील सर्व बंदरांवर सावधगिरीचा बावटाही लावण्यात आला आहे. या काळात शहरातील सखल भागांत पाणी साचण्याचीही शक्यता आहे.वाऱ्याचा वेग आज पहाटेपासूनच वाढण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर हा वेग प्रति तास ८० ते ९० किलोमीटर असेल. ३ जून रोजी चक्रीवादळाचे स्वरूप अधिक तीव्र झाल्यानंतर हा वेग प्रति तास १२५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हा वेग रात्री ११.३०ला ९० किलोमीटरपर्यंत कमी होईल. त्यानंतर ४ जून रोजी दुपारी ११.३०ला हा वेग प्रति तास ४५ ते ६५ किलोमीटर असू शकेल. ४ जूनला चक्रीवादळाचा जोर कमी होऊन त्याचे पुन्हा कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतर होईल, अशी शक्यता आहे. या काळामध्ये मालमत्तेच्या हानीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com