मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षते खाली काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी येणारे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत असं म्हटलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे विधान अतिश महत्त्वाचं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारताकडे किती वेळ हातात आहे, हेच यातून अधोरेखित होतं.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अशातच आता राज्यातील रुग्णांची संख्या 42वर पोहोचली आहे. देशातील रुग्णांचा आकडाही 140च्या पार गेलाय. अशात गर्दी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, आतापर्यंत राज्यात कोरोनाबाबतच्या 800 टेस्ट केल्या असून त्यापैकी 42 पॉझिटिव्ह तर 758 टेस्ट नेगिटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर इतर काही टेस्टचे रिझर्ल्ट येणं बाकी असल्याचंही त्यांनी सांगितलंय. उपचार सुरू असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून ज्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री आहे, ज्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसतायत त्यांचीच चाचणी होईल असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना हा आजार उपचाराना बरा होतो त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये मात्र काळजी म्हणून 'गर्दी टाळा अन्यथा लोकल बंद कराव्या लागतील' असंही टोपे यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे पुण्यात आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेचं वातावरण आहे. हा पीडित नेदरलँड आणि फ्रान्सचा दौरा करुन 14 मार्च रोजी पुण्यात आला. या नव्या रुग्णामुळे पुणे आणि पिंपरी परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या 18 झाली असून राज्यात आतापर्यंत 42 जणांना कोरोनाने ग्रासल्याचं समोर आलं आहे.
येणारे 15 दिवस महत्त्वाचे का आहेत?
चीन पासून सुरुवात होऊन जगभरात पोहचलेला कोरोना व्हायरस भारतात वेगानं पसरतोय.सध्याच्या घडीला भारत कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या दुसर्या टप्प्यात आहे. कोरोनाची साथ दाही दिशांनी पसरण्याची भीती तिसर्या टप्प्यात आहे आणि हे संकट टाळण्यासाठी भारताच्या हाती फक्त 30 दिवस आहेत असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिलाय. आता देशाला तिसऱ्या टप्यावर जाण्यापासून रोखण हेच मोठ आव्हान प्रशासनासमोर आहे. जे काही करायचंय ते आताच करा असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर आधी त्याचे टप्पे लक्षात घेणं आवश्यक आहे.
टप्पा क्रमांक 1
या टप्प्यात साधारणत: कोरोना बाधित देशांमधून येणारे प्रवासी हा आजार घेऊन येतात. भारताने हा टप्पा आधीच पार केलाय
टप्पा क्रमांक 2
विदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे स्थानिक लोकांना संसर्ग होण्यास सुरुवात होते. महाराष्ट्रासह भारतात अशा संसर्गाला सुरुवात झालीय.
टप्पा क्रमांक 3
कोरोनाची लागण विशिष्ट समूहांमध्ये होण्यास सुरुवात होते आणि ही साथ मोठा परिसर व्यापून टाकते.
टप्पा क्रमांक 4
यात कोरोनाची साथ अक्षरश: वणव्यासारखी पसरते. ती कुठे थांबणार याचा अंदाज येत नाही. या टप्प्यावर इटली आणि चीन आधीच
पोहोचलेले आहेत.
पाहा व्हिडीओ -
corona uddhav statement on next 15 days are crusial marathi corona virus maharashtra government india covid 19
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.