जगासाठी ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम होते, युवकांसाठी ते कलाम सर होते तर चिमुकल्यांसाठी ते कलाम चाचा होते. एका वैज्ञानिकाला कदाचितच एवढ्या उपाध्या मिळाल्या असेल. त्यांची कारकिर्द आजही भारतालाच नव्हे तर जगाला प्रेरणा देणारी आहे. तमिळनाडूमधील मच्छिमार कुटुंबात जन्मलेला हा मुलगा देशाचा राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन होईल असा विचार स्वप्नातही कुणी केला नसेल. त्यांच्या या महान कारकिर्दीचा घेतलेला थोडक्यात आढावा... (Dr. A.P.J. Abdul Kalam: Learn about the most popular presidents of India)
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सर यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे झाला. त्यांचं पुर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असं आहे. कलाम सर यांनी आपलं शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केलं. लहान वयातच वडिलांचं छत्र गमावल्यानं डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसंच मिळेत ती अन्य लहान-मोठी कामे करून पैसे कमवून व घरी आर्थिक हातभार लावत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथं बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतलं.
हे देखील पहा -
वैज्ञानिक कारकिर्द
१९६३ मध्ये त्यांनी इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही (सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेतला. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला होता. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचं जगभरातून कौतुक झालं. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी. (मेन बॅटल टँक) रणगाडा तसेच लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
पीपल्स प्रेसिडेंट
सण २००२ साली भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. अब्दुल कलाम हे भारताचे पहिले असे राष्ट्रपती झाले होते की, ज्यांचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. तसेच ते देशातील पहिले असे वैज्ञानिक ठरले जे राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारे अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक असल्याने देशातील सर्वच वैज्ञानिकांची मान अभिमानाने उंचावली गेली. देशाचा पहिला नागरिक या नात्याने देशातील सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या व्यक्तींपैकी अब्दुल कलाम तिसरे असे राष्ट्रपती होते, ज्यांना राष्ट्रपती पद स्वीकारण्याआधीच भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान “भारत रत्न” देऊन सन्मानित करण्यात आल होतं. त्यांच्या आधी हा पुरस्कार डॉ. जाकिर हुसैन आणि डॉ. राधाकृष्णन यांना त्यांच्या राष्ट्रपती बनण्याआधीच देऊन सन्मानित करण्यात आल होतं. कलाम सर राष्ट्रपती झाल्यानंतरही लोकांमध्ये मिसळत होते. त्यामुळेच त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणजेच लोकांचा राष्ट्रपती म्हटलं जात असे.
अखेरचा श्वास
कलाम सर राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी युवकांशी, विद्यार्थ्यांशी असलेलं नातं जोडून ठेवलं. त्यांनी अखेरचा श्वासही समाजकार्यादरम्यान घेतला. २७ जुलै २०१५ रोजी शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती तबेत बिघडली आणि शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला. कलाम सर यांचे देशाच्या विकासात तर योगदान आहेच पण युवकांसाठी ते आजही प्रेरणा आहेत. त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून आजही युवक प्रेरणा घेतात. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.