
Insurance Premium : केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. देशातील सामान्य माणसांसाठी सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)सुरु करण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक वर्गातील लोकांना समान लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत पॉलिसी घेण्याकरिता वर्षभरासाठी कमी रक्कम (Money) भरून विमा मिळवता येतो. जीवन ज्योती विमा योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली होती. तुम्ही देखील दरवर्षी ही रक्कम भरुन या पॉलिसीला विकत घेऊ शकता तसेच या विम्याचा लाभ घेऊ शकता.
1. दोन लाखांपर्यंतचा लाभ
प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याअंतर्गत विमाधारकाचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास वारसदारास 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
18 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेची मॅच्योरिटी 55 वर्ष असून, ही योजना दरवर्षी रिन्यू करावी लागते.
एखाद्या वर्षी प्रीमियम (Premium) जमा न केल्यास विम्याचा लाभ मिळणार नाही आणि योजना बंद असल्याचे मानले जाईल.
पण याचा एक फायदा असाही आहे की, तुम्ही 55 वर्षांचे होईपर्यंत पुन्हा या योजनेचा लाभ घेऊ शकता.
2. दरवर्षी किती रक्कम भरायची ?
जीवन ज्योती विमा योजनेत दरवर्षी 436 रु. रक्कम भरावी लागते. 2022 आधी या योजनेत फक्त 330 रु. रक्कम भरावी लागायची. नंतर, सरकारने ती वाढवून 436 रु. केली.
या विम्याचा प्रीमियम 1 जून ते 30 मे पर्यंत वैध असतो.
चांगली गोष्ट म्हणजे ही पॉलिसी घेणे अतिशय सोपे आहे.
आपल्या आसपासच्या कोणत्याही बँकेत (Bank) जाऊन किंवा घर बसल्या आपल्या बँकेच्या नेट बँकिंग माध्यमातून तुम्ही या योजनेत पॉलिसी घेवू शकता.
3. मुदत विमा योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मोदी सरकारची एक मुदत विमा योजना आहे. मुदत विमा याचा अर्थ असा होतो की, विमाधारकाचा विम्यादरम्यान मृत्यु झाल्यास विमा कंपनी विम्याची रक्कम देते. जर विमाधारक योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही सुखरुप राहिल्यास त्याला योजनेचा कोणताही लाभ मिळत नाही.
4. ग्रामीण भागात योजनेला उत्तम प्रतिसाद
जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 16.19 कोटी खाती समाविष्ट करण्यात आली आहेत. तर, 13,290.40 कोटी रुपयांचा दावा निकाली काढण्यात आला आहे.
या योजनेच्या लाभार्थांबद्दल बोलायचे झाल्यास 52 टक्के महिला लाभार्थी असून एकुण 72 टक्के ग्रामीण भागातील लोकांनी या योजनेअंतर्गत विमा काढला आहे.
5. आधार कार्ड-पॅन कार्डची गरज लागते का ?
देशातील प्रत्येक सामान्य माणसाला आरोग्य विम्याचा लाभ घेता यावा याकरीता मोदी सरकारने 9 मे 2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)सुरू केली होती.
या योजनेत विमा घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, बॅंक पासबुक आणि मोबाइल नंबरची आवश्यकता असते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.