गणेश पांडे
परभणी ः परभणी तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यात रविवारी (ता. ११) झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला. जोरदार आलेल्या पावसाने परभणी शहराची दानादान उडाली असून अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने लोकांना रात्र जागून काढावी लागली, तर अनेक दुकांनामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
परभणी शहरात रविवारी (ता. ११) दुपारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. हा पाऊस रात्री ९ वाजेपर्यंत सुरुच होता. तब्बल सहा ते सात तास झालेल्या पावसाने परभणी शहराची पुर्ती दानादान उडवून दिली. मुख्यवस्तीतील नारायणचाळ ते आर. आर. टॉवर्स, अष्टभुजा चौक, गुजरी बाजार, क्रांती चौक, गांधी पार्क, सुभाषरोड, शिवाजी रोड, कच्ची बाजार, जनता मार्केट या भागातील तळमजल्यावरील दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. त्यामुळे त्या त्या दुकानातील कोट्यावधी रुपये किमतीचा माल पाण्याने भिजला. फर्निचरचे सुद्धा अतोनात असे नुकसान झाले आहे. अन्यत्र सुद्धा तळमजल्यावरील दुकानांमधून पाण्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
महानगरपालिका कर्मचारी, अग्निशमनदल यांच्या जवानांनी या तळमजल्यावरील ठिकठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्याकरता मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू केले होते. परभणी ते मानवत या राष्ट्रीय महामार्गावर दोन पुलाच्या ठिकाणीचे वळण रस्ते संततधार पावसाने रविवारी सायंकाळी वाहून गेल्यानंतर वाहतूक पूर्णतः बंद झाली, सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकला नाहीत.त्यामुळे वाहनधारकांनी बोरवंड मार्गे पाथरी,मानवत गाठण्याच्या कसरती केल्या. जुना पेडगाव रस्त्यावरील कॉलन्यामध्ये रविवारी दुपारपासून पावसाने या रस्त्यासह वसाहती अंतर्गत रस्त्याची दाणादाण उडवली. रस्ते पुर्णतः जलमय झाले तर काही घरांमधून पाणी शिरले त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
गाडगे बाबा नगरातील लोकांचे स्थलांतर
संत गाडगेबाबा नगरातील शेकडो नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाने रविवारी रात्री जवळील सुरक्षितस्थळी हलविले आहे. यानगरात संततधार पावसाने मोठ्या प्रमाणावर घराघरातून पाणी शिरले होते. महानगरपालिकेचे उपमहापौर भगवान वाघमारे, रविद्र सोनकांबळे,रितेश जैन व अन्य लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्व नागरिकांना जवळील एका मंगल कार्यालयात हलविले आहे.
कालवा फोडून पाण्यास वाट
कारेगाव रस्त्यावरील आशीर्वाद नगरमधील जायकवाडीच्या कालव्यात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. सदर पाणी लगतच्या वसाहतींमधून शिरू लागल्याने सतर्क नागरिकांनी तो प्रकार तात्काळ महापालिका सदस्य पोलिस प्रशासनास कळविला. मनपा व पोलिस प्रशासनाने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ धाव घेतली. जेसीबी मशीन आणून कालवा फोडण्याचा निर्णय घेतला. पाण्यास वाट करून दिली दरम्यान आमदार डॉक्टर राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रविवारी रात्री या घटना स्थळास भेट दिली.
मिरखेलजवळ पूरात अडकलेल्या व्यक्तीची सुटका
मिरखेल (ता.परभणी) जवळ पुरात अडकलेल्या सात पुरुष, पाच स्त्रीया, दहा बकऱ्या यांची जिल्हा प्रशासनाने अन्य यंत्रणाच्या मदतीने मध्यरात्री सुटका केली. उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, सहायक पोलिस निरीक्षक श्री. बनसोडे, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी पवन खांडके, मंडळ अधिकारी पक्वान्ने, अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिक आदी लोकांनी त्या सर्वांना सुखरूपपणे बोटीने बाहेर काढले.
संपादन- प्रल्हाद कांबळे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.