औरंगाबाद : औरंगाबाद शिक्षण विभागाने दहावी बारावी परीक्षेच्या केंद्र संचालकांना अजब फतवा काढला आहे. त्यात आता दहावी बारावी परीक्षा केंद्रावरून 'सेल्फी विथ टॉयलेट' पाठवा अशा सूचना करण्यात आल्याने शिक्षण विभागातच खळबळ उडाली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी केंद्र मागून घेणाऱ्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा नसतील तर आताच सांगा आणि सुविधा असल्या तर ते सिद्ध करण्यासाठी 'सेल्फी विथ टॉयलेट' पाठवा, अशा सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने गुरुवारी झालेल्या केंद्र संचालकांच्या बैठकीत दिल्या आहेत. (Latest Marathi News)
येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या तर २ मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. या अनुषंगाने माध्यमिक शिक्षण विभागाने औरंगाबाद जिल्ह्यातील केंद्र संचालकांची बैठक वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित केली होती. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी केंद्र संचालकांना कॉपीमुक्त परीक्षेसह विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी कशी घेतली जात आहे, याचा आढावा घेतला.
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अडचणी होत्या. परंतु आता यंदा होणारी परीक्षा सर्व नियमित नियमांसह होत आहे. त्यामुळे कॉपीमुक्त, तणावमुक्त परीक्षा घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, एका बाकावर एकच विद्यार्थी, स्वच्छ स्वच्छतागृह, सुरू असलेल्या स्थितीतील पंखे, लाइट आणि सीसीटीव्ही असावेत, असे सांगण्यात आले. 'सेल्फी विथ टॉयलेट', तेही जिओ टॅगसह अशी सूचना शिक्षणाधिकारी देशमुख यांनी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.