औरंगाबाद : वाढत चाललेल्या महागाईमुळे आता भाज्यांनाही महागाईची फोडणी बसली आहे. उन्हाळा संपून पावासाळ्याच्या लांबल्याने भाज्यांच्या (Vegetable) किमतीत दोन-तीन पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. या महागाईमुळे (Hike) जेवणात भाजी कोणती करायची असा प्रश्न गृहीणींना पडला आहे. ( Vegetable Price Hike In Aurangabad)
पावसाळ्याच्या तोंडावर औरंगाबादेत (Aurangabad) बाजारात भाज्यांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना बाजारात खिसा रिकामा करावा लागत आहे. त्यात भाज्यांच्या महागाईमुळे औरंगाबाद शहरातील भाजीमार्केटमध्ये बहुतेक ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे बाजारात ग्राहक कधी येतील, याची वाट भाजी विक्रेत्यांना पाहावी लागत आहे,अशी स्थिती आहे.
दररोजच्या जेवणात लागणारा शेवगा, दोडके, कारले आता १०० रुपये किलोने मिळत आहेत. तर टोमॅटो ८० रुपये किलोने मिळत आहेत. तसेच औरंगाबाद शहरात दररोज ३० ते ४० टन टोमॅटो दररोज विक्री होतात. मात्र, टोमॅटोचीही आवक कमी झाली. यामुळे भाव आठवडाभरात ६० रुपयांहून ८० रुपये किलोपर्यंत गेला. त्यापुढे जाऊन सोयाबीन १६० रुपये किलोने मिळाल्याने हे भाव ऐकूनच सर्वसामान्य ग्राहकांचे डोळे पांढरे होतायत.
औरंगाबादेत भाजीमार्केटमध्ये आवक कमी असल्याने भाज्यांचाही तुटवडा आहे. अनेक भाज्यांनी शंभरी पार केल्याने गृहिणींना कोणती भाजी खरेदी करू असा यक्षप्रश्न पडत आहे. यंदा उन्हाने चाळीशीचा टप्पा राज्यभरात सगळीकडे पार गेल्यानं उन्हाळ्यात अति उष्णतेचा परिणाम भाज्यांवरही झाला. यामुळे भाज्यांची आवक कमी झाली. दुसरीकडे लग्नसराई, हॉटेल व्यवसायामुळे बाजारात भाज्यांची मागणी वाढली आहे.
भाज्यांची आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने भाववाढ झाली आहे. त्यामुळे भाज्याचे भाव वाढत गेले. अतिउष्णतेने शेतातच भाज्या खराब झाल्या होत्या. यामुळे भाज्यांची आवक कमी झाली. भाज्यांचे भाव कमी होण्यासाठी एक महिना लागेल. त्यामुळे किमान पावसाळी भाज्या येईपर्यंत भाज्यांच्या महागाईचे चटके ग्राहकांना सहन करावे लागणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.