बीड : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीड (Beed) जिल्ह्यात अवघ्या ७ मिनिटात अतिवृष्टीग्रस्त आणि परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दुपारी दोन वाजता येणारे कृषिमंत्री बीड जिल्ह्यात चक्क ६ वाजता पोहोचले. रात्री अंधारातच त्यांनी नुकसानीची पाहणी उरकून घेतली. (Beed News Today)
परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोडांशी आलेला घासर निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजाला अश्रू अनावर झालेत. बीड जिल्ह्यातही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे राज्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहे. आज सत्तार यांनी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात अतिवृष्टी ग्रस्ताची पाहणी केली. त्यानंतर ते सायंकाळी ६ वाजता नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्यात पोहचले. यावेळी त्यांनी फक्त ७ मिनिटांत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
यावेळी काही शेतकऱ्यांनी मंत्री सत्तार यांच्यासमोर गऱ्हाणे मांडले. सांगा मंत्री महोदय आम्ही जगायचं कसं ? मुलांचे शिक्षण करायचं कसं ? अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली. दरम्यान परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीग्रस्त झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. असे आश्वासन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
'सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतंय'
शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मात्र प्रशासन आणि सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे सरकारने आता तरी या शेतकऱ्यांना सरसकट दिवाळीपूर्वी मदत करावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.