
बीड : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपिटीने कहर केला. तर शनिवारी पुन्हा एकदा (Beed) बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या अरणविहीरा गावाला तुफान अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) अतोनात नुकसान झाले असून फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले असल्याने संसार उघड्यावर आले आहेत. या गारपीटीने भर उन्हाळ्यात हिमाचलचं दर्शन झालं. मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे. (Latest Marathi News)
तुफान बर्फवृष्टीने जिकडं तिकडं फक्त बर्फचं बर्फ..डोंगरावर पांढरा दिसणारा शालू..अन् शेतात अंथरेला पांढराशुभ्र थर, असेच चित्र गावात गारपिटीनंतर होते. मात्र हे हिमाचल प्रदेशातील गाव नसून कायम दुष्काळी असणाऱ्या, बीड जिल्ह्यातील चित्र आहे. तर काल किती मोठी गारपीट झाली, याचा प्रत्यय आज देखील शेताच्या बांधावर येत आहे. आजही काल झालेल्या गारपीटीतील गारा पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आम्ही उद्यापासून पंचनामे करणार असून तात्काळ शासनाला याचा अहवाल पाठवून दिला जाणार आहे. अशी माहिती आष्टी तहसीलदार विनोद गुंडमवर यांनी दिलीय.
बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या अरणविहीरा गावासह परिसरातील अनेक गावात शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची पुन्हा राखरांगोळी झाली. उभ्या पिकांसह माती देखील वाहून गेली. फळबागा उद्धवस्त झाल्या. पोटच्या मुलासारखी जपलेली पिकं डोळ्यादेखत वाहून गेली. आता खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज कसं फेडावं? मुलांचे शिक्षण, घरातील वृद्ध आई- वडिलांचा दवाखाना कसा करावा? असा प्रश्न घेऊन शेतकरी हताश झाला.
डाळींब, केळी बाग उध्वस्त
अरणविहीरा गावातील केळी उत्पादक शेतकरी नंदू कांतीलाल गव्हाणे यांनी आपल्या दीड एक्कर शेतात २२५० केळीचे झाडे लावले होते. यासाठी त्यांना जवळपास साडेतीन लाख खर्च केला. मात्र अवकाळी पावसासह गारपिटने सर्व केळी बाग उध्वस्त झाली. केळीचे जवळपास ३० लाख रुपये उत्पन्न मिळालं असतं. मात्र आता ८० ते ९० टक्के केळी बाग उध्वस्त झाली आहे. तर गावातील रोहिदास शिरसाट या वृद्ध शेतकऱ्यांनी गेल्या सहा वर्षांपूर्वी डाळिंबाची बाग लावली होती. यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च आला होता. मात्र अवकाळी पावसासह गारपिटीने त्यांची बाग देखील उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे रोहिदास सिरसाठ यांचं जवळपास १५ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांची पिकं उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या भागाची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना आधार द्यावा. अशी मागणी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
संसार उघड्यावर
गारपीटीनं शेतकरी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. घरावरील पत्रे उडून गेल्याने घरातील पूर्ण धान्य भिजले आहे. आज पीक नसल्याने पैसे नाहीत, कपडा नाही, धान्य नाही, यामुळे जगावं कसं? आम्ही काय खावं, असा प्रश्न समोर आहे. त्यामुळे मायबाप सरकारने आधार द्यावा. अशी मागणी आपली व्यथा मांडत महिला शेतकऱ्यानी केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.