चेतन व्यास, साम टिव्ही
वर्धा : कोरोनामुळे (Corona Virus) मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. मात्र, हे सानुग्रह अनुदान मृतकांच्या नातेवाईकांच्या बॅंक खात्यात एकदा नाही, तर दोन ते तीनवेळा जमा करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यभरात (Maharashtra) अशी तब्बल २०५३ प्रकरणे उघडकीस आलीये. यामध्ये १० कोटी २६ लाख रुपये अतिरिक्त जमा झाले आहेत. यातील ६३ प्रकरणे ही एकट्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. (Corona Sanugrah Anudan News)
दरम्यान, ज्यांच्या खात्यात चुकीने दोन तीन वेळा अनुदान जमा झाले, त्यांना ते परत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जर ७ दिवसांच्या आत रक्कम परत न केल्यास संबंधित लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे उपसचिव संजय धारुरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे दिले. त्यानुसार एकट्या वर्धा जिल्ह्यातूनच ३१ लाख ५० हजार रुपये परत मागण्यात येत आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसदारांना ५० हजाराचा सानुग्रह देण्याची योजना अंमलात आणली होती. याकरिता वर्धा जिल्ह्यातून २ हजार ४९८ अर्ज ऑनलाईन दाखल झाले होते. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी ऑनलाईन अर्जाची पडताळणी व त्रुट्या तपासून १७२ अर्ज रद्द केले होते. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुसऱ्या तपासणीत २७१ अर्ज रद्द करण्यात आले होते. (Corona Sanugrah Anudan Yojna Scam)
तब्बल ६३ वेळा जमा झाले अनुदान
जिल्ह्यात कोरोनात मृत पावलेल्यांच्या एकूण १,७७८ वारसदारांच्या बॅंक खात्यात ५० हजार सानुग्रह अनुदान जमा करण्यात आली. मात्र, अनुदान जमा झाल्यानंतर लक्षात आले की, २७ मृतकांच्या २७ नातलगांच्या खात्यात ही रक्कम जमा करणे आवश्यक होते. मात्र, २७ वारसांना हे अनुदान तब्बल ६३ वेळा जमा झाले. यात एकाच मृतकाच्या दोन ते तीन नातलगांच्या बॅंक खात्यात अनुदान जमा झाले. (Corona Sanugrah Scam)
अशी होती अर्ज सादर करण्याची प्रक्रिया
सानुग्रह अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा होता. अर्जासोबत मृतकाचे आधारकार्ड, नातलगाचा आधारकार्ड, मृतकाचे मृत्यू प्रमाणपत्र, मृतकाचा रुग्णालयातील मृत्यूचे कारण असल्याच दाखला, तसेच अर्जदाराच्या बॅंकेच्या डिटेल्स ऑनलाईन अपलोड करायचे होते. पहिले जिल्हा शल्यचिकित्सक आणि नंतर आपत्ती व्यवस्थापन कार्यालय त्यानंतर ते अर्ज मुंबई येथील अपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडे पाठविल्या गेले. आणि तेथून सानुग्रह अनुदान मृतकांच्या वारसांनांच्या बॅंक खात्यात जमा केली गेली. (Corona Sanugrah Anudan Yojna Froud)
पैसे परत करा, अन्यथा कारवाई
सानुग्रह अनुदान एकाच मृतकाच्या दोन ते तीन वारसांच्या बॅंक खात्यात जमा झाल्याची बाब उजेडात आली. चुकीने ज्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले त्यांना ते अनुदान परत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. अनुदान न परत केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच सर्वोच न्यायालयाच्या निर्देशांन्वये कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
कशामुळे झाला ‘सानुग्रह’ घोळ?
एकाच मृतकाच्या विविध नातलगांनी अर्ज केले होते. सर्वच अर्जांचा डेटा ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आला. अनुदान वितरीत करण्यासाठी सरकारने सॉफ्टवेअर विकसित केले होते. सर्व डेटा सॉफ्टवेअरमध्ये गेल्यानंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया बॅंकेतील माहितीच्या आधारे करण्यात आली. मात्र, या सॉफ्टवेअरमध्ये एकाच मृतकाचे नाव वारंवार येणे, एकाच मृतकाच्या नातलगांचे अर्ज किती हे शोधू शकेल, अशी सुविधा नव्हती. त्यामुळे हा घोळ झाला.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.