Chandrashekhar Bawankule On Prakash Ambedkar: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामधील पहाटेच्या शपथविधीबाबत एक विधान केले होते. ज्यामध्ये त्यांनी हा शपथविधी म्हणजे राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी खेळली गेलेली खेळी असू शकते असे विधान केले होते.
जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत असून याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. (Chandrashekhar Bawankule)
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे..
याबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला असा समज होता. मात्र जयंत पाटील यांनी जो खुलासा केला त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ न देणे, या षडयंत्रामध्ये राष्ट्रवादीचा सुद्धा हात होता हे सिद्ध झालं अशी खरमरीट टीका केली आहे.
त्याचबरोबर, शरद पवार यांनी अजित पवारांचा बळीचा बकरा केला असे म्हणत याबद्दल लोकशाहीचा खून केल्यामुळे शरद पवारांनी जनतेची माफी मागावी असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी किंचित सेना आणि वंचित सेना असे म्हणत खिल्ली उडवली आहे. याबद्दल बोलताना "किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र आली, मात्र आघाडी सोबत असलेलं पक्ष नाराज आहे, त्यामुळं महाविकास आघाडी निर्णय घेईल, कितीही किंचित आणि वंचित सेना एकत्र आली तरी आम्हला फरक पडणार नाही," असे विधान केले आहे.
प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे..
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपाने मनुस्मृती सोडली तर त्यांच्यासोबतही युती करु असे विधान केले होते, या वक्तव्याचा ही चंद्रशेखर बावनकुळेंनी समाचार घेतला.
याबद्दल बोलताना त्यांनी , "प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे आहेत, बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले शासन मोदी करत आहे, बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मोदी आणि फडणवीस करत आहेत, व्यक्तिगत, विरोधी आहात म्हणून प्रकाश आंबेडकर आमच्यावर आरोप करत आहेत," असे म्हणत प्रकाश आंबेडकरांवर टीका केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.