मुंबई : देशभरात गॅसदरवाढीची (Gas cylinder price) झळ बसलेल्या नागरिकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. स्वयंपाक घरातील एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी ही घोषणा केलीय. दरम्यान, इंधनदरवाढीने होरपळलेल्या वाहनधारकांनाही केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. अशीही घोषणा सीतारामन यांनी आज शनिवारी केली. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा, कारण, महाराष्ट्रातील दर हे सर्वाधिक आहेत. सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो. अशी विनंती फडणवीस यांनी (uddhav Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारला केली आहे.
तसंच त्यांनी केंद्र सरकारबाबत बोलताना म्हटलंय, पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रतिलिटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे अनेकानेक आभार! केंद्र सरकारच्या निर्णयावर फडणवीस म्हणाले, केंद्र सरकार प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपये इतका भार सहन करणार आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे आणि यासाठी 6100 कोटी रुपये आर्थिक भार येणार आहे.केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केले आहे.
गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात.या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे.आता माझी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा. कारण, महाराष्ट्रातील दर हे सर्वाधिक आहेत. सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो.
राज्याने पण आता करुन दाखवावे - आशिष शेलार
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसदरवाढ केंद्र सरकारने कमी केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यावर आता भाजपचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. आशिष शेलार यांनीही ट्विट करत राज्य सरकारला आवाहन केलं आहे. ते ट्विटच्या माध्यमातून म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले.त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईमध्ये मोठा दिलासा केंद्रानेच दिला.राज्याने पण आता करुन दाखवावे. म्हणतात ना..केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
तसंच खासदार नवनीत राणा यांनीही केंद्र सरकारचे आधार मानत राज्य सरकारला आवाहन केलं आहे. त्यांनी व्हिडिओ प्रसारित करुन म्हटलंय की, माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी असं म्हणणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी केव्हा समजणार ? जर महाराष्ट्राची जबाबदारी आहे, तर राज्य सरकार पेट्रेल,डिझेल, गॅसचे दर किती कमी करतात, हे पाहावं लागेल. मुख्यमंत्री नेहमी केंद्र सरकारवर बोट दाखवतात.पण शेतकरी आणि गरिबांना कर कमी करुन दिला नाही तर महाराष्ट्राची जनता त्यांच्यावरच बोट दाखवेल.कर कमी नाही केला, तर त्यांना कुटुंबाच्याच जबाबदारीचं भान असेल, महाराष्ट्राच्या नाही.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.