मुंबई : पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईतील नालेसफाईची कामे काटावर पास व्हावे एवढी 35% च झाली असून प्रशासन जी आकडेवारी देत आहे ती रतन खत्रींचे आकडे आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी गुरूवारी केला. तर 25 वर्षांच्या सत्तेनंतर मुंबईकरांना सुरक्षेची हमी देऊ शकत नसतील तर आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशा शब्दांत आमदार अँड आशिष शेलार यांनी समाचार घेतला.
भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी भाजप नगरसेवकांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा दुसऱ्या टप्प्यातील पाहणी दौरा केला. या दौऱ्यात पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्ष नेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्यासह आपल्या विभागात भाजपा नगरसेवक सहभागी झाले होते. यावेळी मालाड येथील वलनाई, जूहु येथील एसएनडीटी तर कुर्ला येथील मिलिंद नगर नाल्यावर जाऊन कामाची पाहणी करण्यात आली.
या दौऱ्यानंतर भाजपाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेऊन निवेदनासह मुंबईतील नाल्यांचा सचित्र अहवाल सादर केला. त्यानंतर महापालिका मुख्यालयातील भाजपा पक्ष कार्यालयात बैठक घेऊन आमदार आशिष शेलार यांनी या संपूर्ण दौऱ्याची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की "ज्या गोष्टी टाळता येऊ शकतात, पूर्ण होऊ शकतात, नियोजन होऊ शकते, अशा गोष्टी सुद्धा पालिका प्रशासन जाणून-बुजून करताना दिसत नाही. टाळाटाळ केली जाते आहे हा कुठला कट आहे? आम्ही जेव्हा 7 एप्रिलला नालेसफाईची पाहणी करायला उतरलो त्यावेळी सत्ताधारी शिवसेनेकडून आमच्या या पाहणी दौऱ्यावर टीका करण्यात आली, मात्र ते स्वतः तेव्हाही फरार होते आणि आजही फरार आहेत".
"काल जेव्हा दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याचे नियोजन आम्ही सुरू केले त्यानंतर संध्याकाळी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी अंधारात जाऊन नालेसफाईची पाहणी केली. "उजेडात होते पुण्य अंधारात पाप" या गाण्याच्या ओळीची आठवण करून देत हे कसले अंधारात पाप सुरू आहे"? असा खोचक सवालही आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना केला. त्याचबरोबर "मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून महापालिकेतील सत्ताधारी फरार आहेत आणि मुंबईतील नालेसफाईचे चित्र मात्र अत्यंत भयावह आहे काठावर पास व्हावे त्याप्रमाणे नालेसफाईची केवळ 35 टक्केच कामे झाली आहेत त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात मुंबईकर सुरक्षित नाहीत मुंबईकरांच्या मालमत्ता सुरक्षित नाहीत आणि याला जबाबदार महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना आहे". असंही आशिष शेला यांनी म्हटलं आहे.
मुंबईचा बाप कोण? मुंबई कुणाची? अशी भाषणे करता, मग आता मुंबईकरांसाठी रस्त्यावर का उतरत नाही? पंचतारांकित हाँटेलमधील बैठका, पार्ट्या सोडून कधीतरी रस्त्यावर उतरुन प्रत्यक्ष परिस्थितीची आदित्य ठाकरे पाहणी करणार आहेत का? असा सवालही आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी !
येत्या पावसाळ्यात मुंबईकर सुरक्षित असतील याची हमी देता येणार नाही, अशा आशयाचे विधान आदित्य ठाकरे यांनी केले त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, मुंबईची 25 वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर जर आदित्य ठाकरे असे म्हणत असतील तर त्यांनी मुंबईकरांची माफी मागावी.
आता कुठले ट्रेनिंग?
आज पालिका आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की, वृक्ष छाटणी बाबत पालिका आता उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणार आहे. जर पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष छाटणीची ट्रेनिंग होणार असेल तर मग छाटणी कधी करणार? असा सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.