Bachchu Kadu : राज्यात शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सरकार स्थापन होऊन आता सहा महिन्यांहून जास्त काळ लोटला आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांवर सतत टीका करत आहेत. यात आता माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार या वर्षी होणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (Latest Bacchu Kadu News)
राज्यात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली आणि एका रात्रीत महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. या नंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्याने शिंदे- फडणवीस सरकार उभं राहिलं. शिंदे फडणवीस सरकारची स्थापना झाल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे एका वृत्त संस्थेशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी थेट २०२४ चा आकडा सांगितला आहे.
माध्यमांशी बोलताना दिव्यांग मंत्रालयाचं मंत्रीपद तुमच्याकडे कधी येणार? असा प्रश्न विचारल्यावर "मला असं वाटतं की, हा प्रश्न मला नाही तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवा. जेव्हा जेव्हा आम्ही सर्व आमदार एकत्र बसत असतो तेव्हा या बाबत मी त्यांना नेहमी सांगत असतो. २०२४ नंतरच या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.", असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर बच्चू कडू यांना विचारले असता त्यांनी मिश्किलपणे याचे उत्तर दिले आहे. " तसं झालं तर मी तुम्हाला पेढे भरवेल. मात्र तसं काही होणार नाही याची मानसीक तयारी आम्ही केलेली आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.