
नवनीत कुमार तापडीया
औरंगाबाद: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अंमलबजावणी संचालनालय विभाग (ED) ईडीने ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना ताब्यात घेतले गेले. संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी (Chandrakant Khaire) भाजपवर हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांना ईडीने घेतलं ताब्यात ही महाभयंकर आणीबाणी आहे अशी खोचक टीका चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर केली आहे. (Sanjay Raut Latest News)
हे देखील पाहा -
यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले की, "संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेणे ही महाभयंकर आणीबाणी आहे. इंदिरा गांधी यांनी एकवेळा आणीबाणी लावली होती, त्याहीपेक्षा हे भयंकर आहे असं ते म्हणाले. तसेच मोदीजी हे आता बस्स झालं अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली आहे.भाजपकडून शिवसेनेला संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरु असून शिवसेना संपणार नाही. भाजपचे नेतेच या कारवाईच्या विरोधात असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे." पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊंतांवर करण्यात आला होता. राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे.
संजय राऊत यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी लक्ष करुन चौकशीचा ससेमीरा लावला. त्यामुळे ईडीने त्यांना ताब्यात घेणं अपेक्षित होतं. केंद्र सरकारच्या जुमली कारभाराविरोधात शिवसेना रान उठवल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. पत्राचाळ आर्थिक व्यवहारात जर काही गदारोळ झाला होता तेव्हाच राऊतांना ईडीने ताब्यात घ्यायचं होतं. ईडीने शिवसेनेच्या बुलंद आवाजाविरोधात कारवाई केलीय. अशा तपास यंत्रणांविरोधात शिवसेना आक्रमक भूमिका घेईल. संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत ईडीच्या रडारवर होते. हा जमीन घोटाळा १ हजार ३४ कोटी रुपयांचा असल्याची माहिती आहे. गोरेगाव येथे पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्राचाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. परंतु, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला, असा आरोप ईडीनं राऊत यांच्यावर केला आहे.
प्रवीण राऊत यांनी पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली. असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळीचे ३ हजार फ्लॅटचे बांधकाम करायचे होते. मात्र, यापैकी ६७२ फ्लॅट भाडेकरूंना आणि उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासकांना घ्यायचे होते, अशीही माहिती आहे. परंतु, प्रवीण राऊत यांनी २०१० मध्ये गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले.त्यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आले असल्याचे समजते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.