मुंबई : ठाणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्याला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या काळू धरणाच्या (kalu dam) कामांना गती मिळणार आहे. महानगर विकास प्राधिकरणाने (mmrda) तब्बल 336 कोटींचा निधी भुसंपादनासाठी उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी दिले आहेत. तसेच कल्याण मंडणगड-कुशिवली धरणाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी खासदारडॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केली आहे. सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन,ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा,ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अनबलगन,खा.डॉ श्रीकांत शिंदे,आमदार रविंद्र फाटक यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील काळू धरणाच्या उभारणीसाठी मुरबाड तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीतील १८ गावे आणि २३ पाडयांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. तसेच वन विभागाची 999 हेक्टर जमिनही या धरणामुळे पाण्याखाली जाणार आहे.या सर्वं जमिनीच्या भुसंपादनासाठी एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 336कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे भुसंपादन विहित वेळेत पूर्ण होऊन धरणाच्या कामाला गती येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
काळू धरणातून ११४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार
काळू धरणातून ११४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. या धरणाच्या उभारणीमुळे ठाणे,भिवंडी निजामपूर,कल्याण डोंबिवली,उल्हासनगर महापालिका,अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका या शहरांची भविष्यातील पाण्याची तहान भागवली जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ह्या धरणाच्या जमीन अधिग्रहण प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हे धरण वर्षभरात पूर्ण करावे असे निर्देश दिले. या दहा एमएलडी क्षमतेच्या धरणामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचा दाब वाढवण्याची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीला केली. येत्या काही दिवसात हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अनबलगन यांनी या बैठकीत स्पष्ट केले.जांभूळ धरणातून शहाड शहराला पाणीपुरवठा होतो, या पाणीपुरवठा वाहिन्या अतिशय जीर्ण झाल्या असून त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होते. या वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी यावेळी केली. तसेच हा प्रश्न तातडीने मार्गी लावून पाणीपुरवठा नियमित करण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.