नागपूर - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप BJP आणि काँग्रेसमध्ये Congress आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महापालिकेमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपनं शहराचा बट्ट्याबोळ केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर महाविकास आघाडी सरकार विकास कामांसाठी निधी देत नाही, सरकारच्या दबावाखाली आयुक्त फाईल मंजूर करत नाही, असा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे शहरात सध्या काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरात काँग्रेस आणि भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणे सुरू केले आहे. महापालिकेत 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने काहीही कामं केली नाही, शहराचा बट्ट्याबोळ केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मोठा गाजावाजा करत आणलेले प्रकल्प नंतर रद्द करावे लागले, रिंग रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. आश्वासन देऊनंही नागपूरात २४ तास पाणीपुरवठ्याची योजना फोल ठरली असे गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच या कामांची चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.
हे देखील पहा -
तर नागपूर महापालिका आयुक्तांकडे विविध विकास कामांच्या ५५० कोटींच्या फाईल्स प्रलंबित आहेत, महाविकास आघाडीचा महापालिका आयुक्तांवर दबाव आहे. त्यामुळे आयुक्त फाईल्स मंजुर करत नाहीअसा गंभीर आरोप नागपूर महानगरपालिका सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी केला आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडी सरकारने निधीवाटपात भेदभाव करत आहे, मुद्दामून नागपूर मनपाला निधी दिला जात नाही, असा आरोपंही अविनाश ठाकरे यांनी केला आहे.
एकूणच पाच वर्षे शांत असलेले दोन्ही पक्ष आता निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांवर तोंडसुख घेऊ लागले आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हे करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे आणि विकासकामांकडे या राजकारण्यांनी लक्ष द्यावे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.