Bhandara Dongar : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी रोजी पुण्यात (pune) मुलींची पहिली शाळा सुरू केली. या स्त्री शिक्षणाचा पाया वारकरी परंपरेतील महिला संत मुक्ताबाई, संत जनाबाई आणि संत बहिणाबाई यांनी घातलेला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी नुकतेच केले. देहूजवळील भंडारा डोंगर येथे रविवारी ।।ज्ञानबातुकाराम।। या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकाच्या 'संत बहिणाबाई' या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. मोरे म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी (sant tukaram maharaj) संत बहिणाबाईंना 'वज्रसूची' हे पुस्तक दिले. ज्यामध्ये समतेचे विचार सांगितलेले आहेत. आचार्य अश्वघोष लिखित या वज्रसूचीचा अभंगांमध्ये अनुवाद संत बहिणाबाईंनी केला. यामुळे महात्मा फुले यांच्या जातीभेद उच्चाटन कार्याला बळ मिळाले. तुकाराम तात्या पडवळ यांनी 'जातीभेद विवेकसार' हा ग्रंथ लिहिला. महात्मा फुले यांनी हा ग्रंथ छापून त्याची विक्री केली. संत तुकाराम महाराज, संत बहिणाबाई ते महात्मा फुले विचारधारा जोडली गेल्याचे हे उदाहरण आहे, असे डॉ. मोरे यांनी नमूद केले. वज्रसूचीचा एक विभागच संत बहिणाबाई विशेषांकात वाचण्यास मिळेल. बहिणाबाईंच्या या विचारांना उजाळा देऊन, ।।ज्ञानबातुकाराम।। वार्षिकाने या काळात मोठे काम केले आहे.
यावेळी माजी आमदार उल्हासदादा पवार, आळंदी देवस्थानचे विश्वस्त ऍड. विकास ढगे, ज्ञानेश्वर माऊलींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे, विश्वस्त ह. भ. प. माणिक महाराज मोरे, संत सोपानदेव समाधी संस्थानाचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प. त्रिगुण गोसावी, संत जगनाडे महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. शिवदास उबाळे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह. भ. प. बाळासाहेब काशीद, टाळगाव चिखली देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. रोहिदास मोरे, भंडारा डोंगर ट्रस्टचे सचिव जोपाशेठ पवार, 'मटा ऑनलाईन'चे संपादक अभिजीत कांबळे', पत्रकार आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उल्हास पवार म्हणाले, ,'सारासार विवेक' हा आपल्याला बहिणाबाईंनी दिलेला मोठा विचार आहे. हा विवेक राजकीय (political) लोकांनी तसेच, समाजातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी बाळगणे गरजेचे आहे. वारकरी विचारांनी समाजातील भेदाभेद मिटवण्याचे मोठे काम केले आहे.
'संत तुकोबांची तपोभूमी असलेल्या भामचंद्र, भंडारा आणि घोरावडेश्वर या डोंगरावर जाऊन, तुकोबारायांच्या विचारांचे स्मरण करत, नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा पायंडा आम्ही युवकांनी गेल्या तीन वर्षांपासून पाडला आहे.
यंदाच्या अंकामध्ये संत बहिणाबाईंच्या जीवन चरित्र, साहित्याचा आढावा घेण्यात आला आहे. देवगाव रंगारी, शिऊर, कोल्हापूर, वडगाव, देहू येथील त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा 'रिपोर्ताज'मधून घेण्यात आला आहे. तसेच बहिणाबाईंचे विचार समाजात पोहोचविणाऱ्या व्यक्तींच्या मुलखाती घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती विशेषांकाचे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी दिली. यावेळी ऍड. विकास ढगे, राजाभाऊ चोपदार, नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, त्रिगुण गोसावी, उल्हास पाटील, अभिजीत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी 'तुकाराम-बहिणाबाई' असा गजर करत टाळमृदंगाच्या निनादात दिंडी काढली. भंडारा डोंगर ट्रस्ट आणि 'आई नाना प्रतिष्ठान'तर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आभार प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी मानले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.