
Aurangabad Latest News: औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नदीमध्ये उतरत आंदोलन केले आहे. गावांना जोडणारा रस्ता आणि नदीकाठी पूल नसल्याने गावकऱ्यांनी नदीमध्ये उतरत आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदी काठावरील गावांना जाण्यासाठी आणि शेतीमध्ये जाण्यासाठी रस्त्यावर पूल नसल्यामुळे औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नदीमध्ये आंदोलनाला (Protest) सुरुवात केली आहे. काही गावकरी नदीमध्ये उतरले आणि त्यांनी जलसमाधीचा इशारा दिला आहे. गंगापूर तालुक्यातील बगडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या गोदावरी नदीकाठी असून नदीला येणाऱ्या पाण्यामुळे, तसेच गोदेचे बॅक वॉटर सतत आसपासच्या परिसरात आणि रस्त्यावर पसरते. त्यामुळे शेतात जाण्याकरिता असलेला रस्ता वाहून जातो. (Gangapur Farmers Protest In River)
सध्या देखील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. सध्या शेतात कापूस वेचणीसाठी आला आहे. त्यामुळे बगडी येथील महिलांना कापूस वेचणीसाठी थर्माकलच्या तराफ्याचा वापर करून पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत शेत गाठावे लागत आहे. गोदावरी नदीच्या पाण्यातून तराफ्याद्वारे शेतात जाताना महिलांना हा जीवघेणा प्रवास करणारे चित्र सोमवारी सकाळी पाहायला मिळाले.
या समस्येवर बगडी येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी लोकसहभागातून येथे मुरूम टाकून तात्पुरता रस्ता तयार केला जातो. मात्र, गोदावरी नदीला येणाऱ्या पाण्याने हा रस्ता वाहून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी तराफ्याच्या साहाय्याने जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करावा लागतो. तालुक्यातील अनेक गावे जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे पुनर्वसित झाली आहेत.
या धरणाला सुमारे ५० वर्षे उलटून देखील धरणासाठी जमिनी घेतलेल्या गावातील लोकांना शासनाच्या वतीने मूलभूत सुविधा अद्यापही मिळाल्या नाही. शेतकरी आणि ग्रामस्थांच्या या जीवघेण्या समस्येकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
सध्या काढणीला आलेला कापूस आणि तोडणीला आलेला ऊस रस्ता नसल्याने गोदावरीचे पाणी पार करुन कसा काढायचा? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. याठिकाणी पूल झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. त्याकरिता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.