कुरुळा ( जिल्हा नांदेड ) : नुकत्याच झालेल्या आणि उर्वरित होत असलेल्या खरिपाच्या पेरण्यामुळे शेतीशिवारात वर येणाऱ्या कोवळ्या पिकावर हरणांचे झुंड ताव मारताना दिसत आहेत. त्यामुळे कुरुळा (ता. कंधार) परिसरात त्रस्त बळीराजाने पिकाच्या रक्षणासाठी आपला मुक्काम आता थेट बांधावर वाढवला असल्याचे चित्र आहे.
कुरुळा आणि दिग्रस महसूल मंडळात जवळपास खरिपाच्या पेरण्या उत्तरार्धात आल्या असून मुबलक प्रमाणातील पर्जन्यमानामुळे तुरळक अपवाद वगळता बऱ्यापैकी बियाण्यांची उगवण होऊन मोड जमिनीबाहेर आले आहेत. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली असून लसलशीत कोवळ्या पिकावर हरणांच्या कळपाने ताव मारायला सुरुवात केली आहे. अस्मानी संकटाबरोबर जैविक संकटामुळे बळीराजा त्रस्त झाला असून हरीण, मोर, वानर यांच्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्री अपरात्री शेतकरी बांधावर फिरकताना दिसत आहेत.
तर कारतळा, मोहिजा परिसरातील शेतकऱ्यांनी तर चक्क बंधावरच राहण्याची तजवीज केली असल्याचे पाहायला मिळते. वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. अगोदरच कोरोनाने बळीराजाचे अर्थकारण ग्रासले त्यात वनविभागाचा कुंभकर्णी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर उठला की काय असे बोलल्या जात आहे. बऱ्याच वेळा हरणांच्या जीवितासोबत घातपात झाले परंतु त्यासंदर्भात वनपाल कुठे असतात? घटनास्थळी केवळ वनमजुरास पाठवून अनेक प्रकरणे दाबली जात असल्याची चर्चा आहे.
वनविभाग की सुन्नविभाग
प्रतिवर्षी पेरणीनंतर हरणांच्या कळपामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते परंतु शेतकऱ्यांची आर्त हाक बधिर वनविभागाला ऐकू येत नसेल का?वनविभाग हा सुन्नविभाग झाला आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.