- सागर निकवाडे
Nandurbar News : नंदूरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव थुवनी गावातील करसन्या नाऱ्या पाडवी या आदिवासी शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Maharashtra News)
करसन्या नाऱ्या पाडवी यांचे गरीब कुटुंब असुन मोसमी डोंगराळ शेती करून उदरनिर्वाह करते. घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू, धान्य,कपडे आणि महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आग लागताच जवळपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
परंतु करसन्या नाऱ्या पाडावी यांचे घर टेकडीवर असल्याने वाऱ्यामुळे आगीने राैद्ररुप धारण केले. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंसह धान्याची राख झाली.
या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे. करसन्या नाऱ्या पाडवी याच्या परिवाराच्या घराला आग लागून उभा संसार काही मिनिटातच जळून खाक झाला. महसूल विभागाच्या वतीने आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.