-- राजेश भोस्तेकर
रायगड : भाजपच्या केंद्र सरकारने केलेल्या महागाई विरोधात काँग्रेसकडून येत्या १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत रायगडात जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गाव वाडीवर जाऊन जनतेला भाजपच्या महागाईच्या भस्मासुराबाबत अवगत करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत आणि जिल्हा सह प्रभारी श्रीरंग बरगे यांनी दिली. अलिबाग येथील बॅरीस्टर अंतुले भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हे देखील पहा :
यावेळी काँग्रेसच्या महिला आघाडी प्रमुख श्रध्दा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण ठाकूर, तालुकाध्यक्ष योगेश मगर, अँड.जे.टी.पाटील याच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या वर्षभरात ९६ वेळा पेट्रोलचे दर वाढले आहेत. पेट्रोलचे दर ११० रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलचे दर १०० पार झाले आहेत. घरगुती गॅसचे दर वर्षभरात २२० वेळा वाढले आहेत, इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. मात्र, भाजप सरकार यावर बोलायला तयार नाही. भाजपच्या मंत्री स्मृती इराणी ह्या काँग्रेस सरकार काळात आंदोलन करीत होत्या पण आता गप्प का असा सवालही बरगे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
त्यामुळे महागाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे जनजागरण अभियान आयोजित केले जाणार असल्याचे श्रीरंग बरगे यांनी यावेळी सांगीतले. प्रत्येक तालुक्यात या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. पदयात्रा, निदर्शने, गावभेटी, जागरण, छोट्या सभा, यासारख्या उपक्रमांचे या निमित्ताने आयोजन केले जाणार आहे. म्हसळा येथे १८ नोव्हेंबर रोजी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत महागाई विरोधात पदयात्रा काढली जाणार असल्याचे महेंद्र घरत यांनी सांगीतले.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.