-- राजेश भोस्तेकर
रायगड : वादळ, अवेळी पाऊस, थंडी तसेच सतत बदलत असलेल्या वातावरणाचा समुद्रात मासेमारी करणाऱ्या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यातच आता धरमतर खाडीत सोडत असलेल्या जेएसडब्लू (JSW) कंपनीच्या दूषित पाण्याचा फटका पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांना बसला आहे. धरमतर खाडीत कंपनीच्या नव्या कोक प्लांटचे दूषित पाणी सोडले जात असल्याने हजारो मासे (Fish) मृत्युमुखी पडले आहेत.
हे देखील पहा :
त्यामुळे मासेमारी (Fishing) व्यवसाय करायचा कसा आणि चरितार्थ चालवायचा कसा असा प्रश्न खारेपाट विभागातील मच्छीमार बांधवांना पडला आहे. मच्छीमाराचा हा प्रश्न शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) याच्या माध्यमातून सोडविण्यात आला असून कंपनीकडून पाहणी करून मच्छीमाराना नुकसान भरपाई देण्याचे कंपनी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे. नुकसान भरपाई आठ दिवसात न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार दळवी यांनी दिला आहे
अलिबागमधील (Alibag) धरमतर खाडीत परिसरातील गावातील नागरिक हे गेली अनेक वर्षे पारंपरिक मासेमारी करीत आहेत. मासेमारी करून बाजारात मासे विकून ते आपला कुटूंबाचा चरितार्थ चालवीत आहेत. मात्र, गेली दहा बारा वर्षापासून धरमतर खाडीलगत जेएसडब्लू तसेच अन्य कंपन्यांनी विस्तार वाढविला आहे. याचा परिणाम हा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार व्यवसायिकांवर होऊ लागला आहे.
जेएसडब्लू कंपनीचा कोक प्लांट हा खाडी किनारी परिसरात आहे. या प्लांटचे दूषित गरम पाणी कोणतीही प्रक्रिया न करता खाडीत सोडले जात आहे. याचा परिणाम हा माशांवर झाला असून दूषित पाण्यामुळे खाडीत प्रदूषण (Pollution) झाले असून मासे मृत पडू लागले आहेत. त्याचबरोबर पाण्यावर तेलाचा तवंग ही साचू लागला आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्याच्या व्यवसायाला आर्थिक फटका बसू लागला आहे.
कंपनीच्या जल प्रदूषणामुळे काचली, पिटकरी, खातीवरे, कातळपाडा, डभेवाडी, कुसुबळे, वाघवीरा, चिखली, हेमनगर येथील दीडशे ते दोनशे मच्छीमार कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रश्नाबाबत मच्छीमार बांधवांनी शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी याच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र दळवी याची भेट घेऊन आपली समस्या मांडली.
आमदार महेंद्र दळवी यांनी त्वरित कंपनी अधिकारी आणि मच्छीमार याची राजमळा येथे संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कंपनी अधिकारी यांना आठ दिवसात मच्छीमारांची नुकसान भरपाई द्या अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. कंपनीचे एच आर अधिकारी बळवंत जोग हे उपस्थित होते. त्यांनी प्रदूषणाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.