अभिजीत सोनवणे
नाशिक: गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला श्री राम जन्मभूमीचा मुद्दा आता कुठे निवळला असतानाच, आता हनुमान जन्मभूमीवरून (Hanuman Birth Place) नवा वाद उफाळला आहे. कर्नाटकातील किष्किंधा हीच हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा किष्किंधाचे महंत गोविंदानंद महाराजांनी केला असून, नाशिकचे अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थान असल्याचं सिद्ध करावं, अस आव्हान त्यांनी नाशिकच्या साधू-महंतांना दिलं आहे. त्यामुळे हनुमान जन्मभूमी वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. (kishkindha Karnataka hanuman birth place claims Mahant Govindanand Anjneri Nashik)
नाशिकजवळच्या (Nashik) या अंजनेरी पर्वतावर श्रीराम भक्त हनुमानाचा जन्म झाल्याचा उल्लेख अनेक महात्म्य आणि पुराणांमध्ये आला आहे. या ठिकाणी हनुमान मंदिर असून हनुमानाने सूर्याला गिळण्यासाठी पृथ्वीवरून उड्डाण केलं, त्या जागी हनुमानाच्या पावलांमुळे पायाच्या आकाराचा तलाव निर्माण झाल्याचीही आख्यायिका आहे. वर्षानुवर्षे देश विदेशातील भाविक या ठिकाणी हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात. मात्र आता इतक्या वर्षानंतर हनुमानाच्या जन्मभूमीवरून नवा वाद सुरू झालाय. कर्नाटकमधील किष्किंधा मठाचे महंत गोविंदानंद सरस्वती यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या वादाला सुरुवात झाली आहे. हनुमानाचा जन्म किष्किंधामध्ये झाल्याचा दावा गोविंदानंद महाराजांनी केला आहे. शिवाय अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान आहे, हे पुढील ६ दिवसांत सिद्ध करावं, अन्यथा किष्किंधाचा दावा मान्य करावा, असं आव्हानही त्यांनी नाशिकच्या साधू-महतांना दिलं आहे.
गोविंदानंदांच्या या दाव्यामुळे नाशिकच्या साधू-महंतांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गोविंदानंदांच्या दाव्याला नाशिकच्या साधू महंतांनी विरोध केला असून अंजनेरीच हनुमानाचे जन्मस्थान आहे, याचे अनेक दाखले पुराणात आहेत. त्यामुळे हनुमान जन्मस्थानावरून वाद निर्माण न करण्याचं आवाहन नाशिकच्या साधू महंतांनी केलं आहे.
ज्या वाल्मिकी रामायणाचा दाखला देत गोविंदानंद सरस्वतींनी किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा केला आहे, त्या वाल्मिकी रामायणात नेमकं काय म्हटलंय, हे देखील साम टिव्हीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वाल्मिकी रामायणाच्या किष्किंधाकांडमध्ये हनुमानाच्या जन्माचा उल्लेख असला, तरी त्यात जन्मस्थळाचा उल्लेख नाही, असे संस्कृत अभ्यासकांचे मत आहे. तर या वादावर तोडगा काढण्यासाठी देशभरातील साधूमहंत, आचार्य, पिठाधीश्वर यांची बैठक देखील बोलवण्यात आली आहे.
केवळ अंजनेरी आणि किष्किंधाच नव्हे, तर आंध्र प्रदेशातील तिरुपतीसह देशात ९ ठिकाणी हनुमानाची जन्मभूमी असल्याचे दावे स्थानिक मठांकडून करण्यात आल्याने हनुमान जन्मभूमीचा वाद उफाळून आला आहे. तिरुपती हनुमानाची जन्मभूमी असल्याचा वाद तर अगदी कोर्टात पोहोचला आहे. आता नाशिकचे साधू-महंतही गोविंदानंदांच्या किष्किंधा हनुमान जन्मभूमी असल्याच्या दाव्याला खोडून काढण्यासाठी एकवटले असून, येत्या ३१ मे रोजी हनुमान जन्मभूमी वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये देशभरातील साधू-महंतांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठकीत सर्व साधू महंतांच्या उपस्थितीत सर्वानुमते जो निर्णय होईल, तो सर्वांनी मान्य करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे हनुमान जन्मभूमी वादावर ३१ मे रोजी काय तोडगा काढला जातो, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.