Farmers Long March: शेतकऱ्यांचा लाँग मार्च विधानभवनावर धडकणार; नाशिकहून निघालेला मोर्चा तब्बल ८ दिवसांनी मुंबईत पोहोचणार

२१ मार्चला किसान सभा आणि माकपच्या नेतृत्वाखाली शेतकरी मुंबईत पोहोचणार आहेत.
Farmer
Farmer Saam Tv

नाशिक : शेतकऱ्यांचा मोर्चा पुन्हा एका नाशिकहून मुंबईत धडकणार आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी विविध मागण्यांसाठी विधानभवनावर येणार आहेत. आज दुपारी दिंडोरीहून मुंबईकडे शेतकरी पायी निघाले आहेत. २१ मार्चला किसान सभा आणि माकपच्या नेतृत्वाखाली शेतकरी मुंबईत पोहोचणार आहेत.

शेतकऱ्यांचा आजचा मुक्काम नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ असणार आहे. तब्बल ८ दिवसांत पायी प्रवास करत शेतकरी मुंबईत पोहोचणार आहेत. २१ मार्चला जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी मुंबईत पोहोचतील. शेतमालाचे पडलेले भाव आणि हक्काच्या वन जमिनीसाठी आदिवासी शेतकऱ्यांचा पुन्हा मोर्चा निघाला आहे.

मागण्या काय आहेत?

>> कांद्याला ६०० रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या. कांदा निर्यातीच्या सर्व शक्यता पडताळून पाहून कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करा. किमान २००० रुपये दराने कांद्याची नाफेड मार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी करा.

>> कसणाऱ्यांच्या ताब्यात असलेली ४ हेक्टरपर्यंतची वनजमीन कसणाऱ्यांच्या नावे करून ७/१२च्या कब्जेदार सदरी कसणाऱ्यांचे नाव लावा. सर्व जमीन कसण्यालायक आहे असा उताऱ्यावर शेरा मारा. अपात्र दावे मंजूर करा. गायरान, बेनामी, देवस्थान, इनाम, वक्फ बोर्ड, वरकस व आकारीपड जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा. ज्या गायरान, गावठाण व सरकारी जमिनीवर घरे आहेत, ती घरे व घराची तळ जमीन राहात असणाराच्या नावे करा.  (Letest Marathi News)

Farmer
Weather Alert : राज्यात आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज; जाणून घ्या, कधी, कुठे पडणार पाऊस?

>> शेतकऱ्यांच्या शेतीला लागणारी वीज दिवसा सलग १२ तास उपलब्ध करून शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करा.

>> शेतकऱ्यांचे शेती विषयक संपूर्ण कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा.

>> अवकाळी पावसाने व वर्षभर सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची एन.डी.आर.एफ. मधून तत्काळ भरपाई दया. पीक विमा कंपन्यांच्या लुटमारीला लगाम लावून पीक विमा धारकांना नुकसानीची भरपाई देण्यास कंपन्यांना भाग पाडा.

>> बाळ हिरडा पिकाला प्रतिकिलो किमान २५० रुपये हमी भाव देऊन हिरड्याची सरकारी खरेदी योजना सुरू ठेवा. २०२०च्या निसर्ग चक्रीवादळी पावसात हिरडा पिकाच्या नुकसानीच्या झालेल्या पंचानाम्यांच्या आधारे शेतकऱ्यांना देय असलेली भरपाई तत्काळ द्या.

>> दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मिल्कोमिटर व वजन काट्यांची नियमित तपासणी करण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारा. मिल्कोमिटर निरीक्षकांची नियुक्ती करा. दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा. गायीच्या दुधाला किमान ४७ रुपये आणि म्हशीच्या दुधाला किमान ६७ रुपये भाव द्या.

>> सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा पिकांचे भाव पाडण्याचे कारस्थान थांबवा.

>> महामार्ग बाधित शेतकऱ्यांना केरळच्या धर्तीवर मोबदला द्या. योग्य पुनर्वसन करा. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करा.

>> २००५ नंतर भरती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. तसेच समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करा. अंशत: अनुदानित शाळांना १००% अनुदान मंजूर करा.

>> सध्याच्या महागाईचा विचार करता गरीब शेतकरी, शेतमजूर, कामगार, झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान १ लाख ४० हजारावरून ५ लाख करा व वंचित गरीब लाभार्थ्याचा नवीन सर्वे करून त्यांची नावे 'ड' यादीत समाविष्ट करा,

>> अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील, अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना शासकीय वेतन श्रेणी लागू करा.

Farmer
Jayant Patil : देवसुद्धा यांच्या नावाने ठणा ठणा करतील, जयंत पाटलांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

>> दमनगंगा-वाघ-पिंजाळ व नार-पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प रद्द करून सुरगाणा, पेठ व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांना छोटे मोठे सिमेंट कॉंक्रीटचे बंधारे, पाझर तलाव, लघुपाटबंधारे या सारख्या योजना घेऊन प्रथम पुरेसे पाणी स्थानिकांना देऊन उर्वरित पाणी बोगद्याव्दारे गिरणा व गोदावरी नदीत सोडून कळवण, देवळा, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, खानदेश आणि मराठवाड्यासारख्या महाराष्ट्रातील दुष्काळी विभागाला द्या.

>> महाराष्ट्रात आदिवासींच्या राखीव जागांवर जातीची खोटी प्रमाणपत्रे वापरून बिगर आदिवासींनी नोकऱ्या बळकवल्या आहेत, अशा बोगस लाभार्थीना नोकरीवरून कमी करून त्या जागांवर खऱ्या आदिवासींना घ्या व आदिवासींच्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरा.

>> महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना व इतरांना लागू असलेली वृद्धापकाळ पेन्शन व विशेष अर्थसहाय्य योजनेची रक्कम किमान ४००० रूपयांपर्यंत वाढवा.

>> रेशनकार्ड वरील दरमहा मिळणाऱ्या मोफत धान्यासह विकतचे धान्य पुन्हा सुरू करा.

>> सरकारी नोकरींमधील रिक्त पदे भरा, कंत्राटी कामगार- कर्मचाऱ्यांना कायम करा, किमान वेतन दर महा २६००० रुपये करा.

लाँग मार्चचं वेळापत्रक

>> रविवारी पहिला मुक्काम- नाशिकच्या म्हसरूळजवळ

>> सोमवारी दुसरा मुक्काम- वाडीवऱ्हेजवळ

>> मंगळवार तिसरा मुक्काम - घाटनदेवी

>> बुधवार चौथा मुक्काम - शहापूर जवळ कळंब

>> गुरुवार पाचवा मुक्काम - भातसा नदी किनारी, भिवंडी जवळ

>> शुक्रवार सहावा मुक्काम - आनंदनगर, ठाणे

>> शनिवार सातवा मुक्काम - सोमय्या मैदान, मुंबई

>> रविवार आठवा मुक्काम - आझाद मैदान, मुंबई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com