Supreme Court Decision on Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्या अंतिम निकाल येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटातील नेत्यांनी निकाल आपल्याच बाजूने येईल अशा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या निकालाबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी कोणी काय काय प्रतिक्रिया दिली पाहूया...
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
याबाबत माहिती समोर आल्यानंतर पत्रकारांनी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. यावर ते म्हणाले आहेत की, ''सुनावणी झाल्यानंतर तुम्हाला भेटतो आणि तुमच्याशी बोलतो.'', असं म्हणत त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या उद्या येणाऱ्या निकालावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही आशावादी आहोत, कारण आमची केस मजबूत आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे गांभीर्याने पाहिलं पाहीजे , त्याबद्दल अंदाज लावणं योग्य नाही. पण आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत", असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंची सावध प्रतिक्रिया
दरम्यान याबाबत शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. उद्या निकाल येणार आहे तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न विचारल्यानंतर अदित्य ठाकरे यांनी 24 तास थांबूया अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Political News)
देशात लोकशाही आहे की नाही याचा फैसला उद्या होईल - संजय राऊत
या देशात लोकशाही आहे की नाही याचा फैसला उद्या होईल अशी प्रतिक्रिाय संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. ते म्हणाले, हा देश विधानसभा आणि संसद या संविधानानुसार चालला की नाही,न्यायव्यवस्था कुणाच्या दबावाखाली काम करतंय का याचाही फैसला उद्या होईल. आम्ही उद्याच्या निर्णयाची वाट बघत आहोत. आम्हाला खात्री वाटतेय आम्हाला न्याय मिळेल. (Maharashtra Political News)
निकाल येण्याअगोदर बोलणं योग्य नाही - उदय सामंत
सत्तासंघर्षावरील निकालाबाबतच्या सुनावणीवर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''आमच्या सर्वोच्च न्यायालयामधील वकिलांनी न्यायालयात योग्य ती बाजू मांडली आहे. आम्ही योग्य पुरावा दिला आहे. न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर बोलणं योग्य नाही. ते म्हणाले, ''निकाल देणे हा सर्वोच्च न्यायालयचा अधिकार आहे. सगळे पुरावे सगळी कागदपत्र देऊन आमची बाजू आम्ही भक्कम केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून योग्य निकाल येईल हीच अपेक्षा आम्हाला आहे.''(Latest Political News)
निकाल आमच्याच बाजूने लागेल - शिरसाट
सर्व कायदेशीर बाजू तपासूनच आम्ही हा उठाव केला होता. त्यामुळे उद्याचा निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते (शिंदे गट) संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल जो असेल तो आम्हाला मान्य असेल पण निकाल आमचा बाजूने लागेल असा आमचा विश्वास आहे असे ते म्हणाले.
अध्यक्षांकडे संविधानाचे अधिकार - प्रवीण दरेकर
प्रवीन दरेकर (Praveen Darekar) म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत जर तरच्या गोष्टींना काहीही अर्थ नाही. विधीमंडळ हे कायदेमंडळ आहे. अध्यक्षांकडे संविधानाचे अधिकार आहेत. या सरकारला धोका नाही. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.