मुंबई: ऑगस्ट महिना जवळ आला की पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra) वर्तमान पत्रात बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमीच्या बातम्या यायला सुरू होतात. या वर्षी कशी असणार नागपंचमी, कोणते निर्बंध असणार, जीवंत नागाची पूजा करण्यास परवानगी मिळणार का? अशा आशयाच्या बातम्या सुरू असतात. आता तुमच्या डोक्यात एक प्रश्न पडला असेल हे बत्तीस शिराळा काय आहे, आणि जीवंत नागाची पूजा अशी कधी कोण करत का? महाराष्ट्रात एक अस गाव आहे तिथे जीवंत नागाची पूजा केली जात चला तर मग जाणून घेऊया बत्तीस शिराळ्याच्या (Shirala) नागपंचमीचा रंजक इतिहास. (Nag Panchami)
अगोदर आपण पश्चिम महाराष्ट्रात (Maharashtra) बत्तीस शिराळा नेमकं आहे कुठे हे पाहूया. सांगली शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरील पेठ नाका येथून १५ किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गाच्या कुशीत वसले आहे. शिराळा येथून वारणा (चांदेली) धरण ५० किलोमीटर आहे. नागपंचमी दिवशी या गावात खऱ्या नागांची पूजा केली जायची, बत्तीस शिराळा हे महाराष्ट्रातील एकमेव गाव असावे जिथे खऱ्या नागांची पूजा केली जात होती.
पूर्वी या गावात खरे नाग पकडून पूजा केली जायची. नागपंचमी दिवशी स्पर्धा आयोजित केली जायची. जशी गणपती मंडळे असतात तशी या गावात नागपंचमी उत्सवाचे मंडळं आहेत. बत्तीस शिराळा म्हणजे सांगली जिल्ह्यातील एक तालुका आहे. शिराळा या गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे. या गावात पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ३२ गावांचा महसूल गोळा केला जायचा, म्हणून या गावाला ३२ शिराळा अस नाव पडले आहे.
नागपंचमीची माहिती देताना ३२ शिराळा येथील अक्षय पाटील सांगतात, साधारण १२०० वर्षापासून येथे जीवंत नागाची पूजा केली जात होती. येथील जीवंत नागाच्या पजेची सुरुवात गोरक्षनाथांनी केली होती, नाथांनी ही नागाची भीती लोकांमधून निघून जावी यासाठी जीवंत नागाची पूजा केल्याचे बोलले जाते. पुढे तेव्हापासून या परंपरेला सुरूवात झाली. नागपंचमीच्या काही दिवस अगोदर परिसरात नाग पकडण्यासाठी हातात मोठी काठी, मडके घेऊन युवक फिरत असतात. नाग पकडण्याची कला येथील युवकांमध्ये आहे आणि ती परंपरेने आली आहे. ते नाग पकडून पूजा झाल्यानंतर त्याच ठिकाणी ते नाग सोडले जातात. शिराळा येथील युवकांच्यामध्ये नागाविषयी एक वेगळे प्रमे, आपुलकी आहे.
अक्षय पाटील सांगतात, नागपंचमी दिवशी नागांची पूजा केली जायची. त्यांचा पाहुणचार करुन नागपंचमी दिवशी गावातील ग्रामदेवतेची पूजा करुन साधारणपणे १०० ते २०० नागांची मिरवणूक काढली जात होती. यात नागांच्या स्पर्धासुध्दा असायच्या. राज्यभरातून भाविक जीवंत नागांचे दर्शन घेण्यासाठी शिराळा मध्ये येत असायचे. शिराळामध्ये दोन मोठी मुख्य मंदिरे आहे. एक गोरक्षनाथ मंदिर आणि दुसरे अंबामाता मंदिर या दोन मंदिर मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी केली जायची.
पण २०१२ पासून जीवंत नागाची पूजा बंद करण्यात आली आहे. नागांच्या स्पर्धेमुळे प्रचंड हाल व्हायचे त्यामुळे वन्यजीवप्रेमींनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने यावर २०१२ मध्ये बंदी आणली आहे. त्यामुळे सध्या जीवंत नागाची पूजा कुणीही करत नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.