
ठाणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अखेर महाराष्ट्राची माफी मागितली आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली आहे. २९ जुलै रोजीच्या एका कार्यक्रमात मुंबईच्या (Mumbai) विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली, असे म्हणत कोश्यारी यांनी आपली चूक मान्य केली आहे. कोश्यारी यांनी माफी मागितल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Jitendra Awhad News In Marathi )
राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राजभवनावर मोर्चा काढला होता. त्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्ते ठाण्यातून बसने मुंबईच्या दिशेने निघाले होते. परंतु पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या बस मध्येच अडवल्या. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चानंतर दुसरीकडे आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितली. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या मोर्च्यानंतर हा मराठी माणसाचा विजय आहे. राज्यपाल कोश्यारी यांची तीन वर्ष झाली आहेत. त्यांनी आता जावं. त्यांच्यावर दबाव आल्यामुळे त्यांनी माफी मागितली'.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी माफीनाम्यात काय म्हणाले ?
दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली.
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.
महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.
भगत सिंह कोश्यारी राज्यपाल, महाराष्ट्र
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.