Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती'च्या भाग 2 चे (Lok Majha Sangati-2) आज प्रकाशन झाले. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शिवसेना आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामाचा उलगडा त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कसं काम केलं याचा उल्लेख शरद पवारांनी या पुस्तकात केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 'मुख्यमंत्री झाल्यावरही उद्धव ठाकरेंच्या शर्ट-पँट अशा मुंबईकर मध्यमवर्गीयाच्या पोषाखात सहजपणानं वावरण्याचं एक अप्रूप सर्वांनाच होते. कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकद्वारे साधलेला संवाद सहज आणि आपुलकीचा असल्यानं मध्यमवर्गाला ते फारच भावलं. त्यांना सहकार्य केलं पाहिजे, असं या वर्गाला वाटत होतं.'
त्यासोबतच, 'मंत्रालयातल्या प्रशासकीय वर्गाीशी त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना होती. मंत्रालयातला वर्ग तीन आणि चारचा कर्मचारी सामान्य मुंबईकर आहे. या वर्गानं उद्धवांना मनःपूर्वक साथ दिली. या सर्व झाल्या उद्धव यांच्या जमेच्या बाजू. मात्र उद्धवांना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या.', असं देखील त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांची अनेकदा प्रकृती ठिक नसल्याचा उल्लेख देखील त्यांनी पुस्तकात केला आहे. 'मुख्यमंत्री असताना त्यांचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं.', अशी नाराजी शरद पवारांनी या पुस्तकातून व्यक्त केली आहे. 'बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती.', अशी टिपण्णी देखील त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केली आहे.
'उद्धव ठाकरेंच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती याचा विचार करूनच भेटण्याची वेळ ठरवावी लागत असे. 'महाविकास आघाडी'चं जनकत्व माझ्याकडे होतं, त्यामुळे पालकाच्या भूमिकेतूनच मी याकडे पाहत होतो. रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना उद्धव यांच्या प्रकृतीचं वर्तमान समजत असे. मग मी स्वतःच त्यांची विचारपूस करण्यासाठी 'मातोश्री'वर वडिलकीच्या नात्यानं गेलो होतो. आमच्यापर्यंत आलेले काही विषय उद्धवशी संपर्क करून मी कानांवर घालायचो, काय करायला हवं, याबाबतही सूचना करायचो. त्या सूचनांवर कार्यवाही होत असे, असाही माझा अनुभव आहे.' असं पवारांनी पुस्तकात सांगितलं.
'राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बितेबातमी हवी. त्याचं यावर बारीक लक्षं हवं. उद्या काय होऊ शकते याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी आणि त्यानुसार आजच काय पावलं उचलायला पाहिजेत हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य हवं. या सर्व बाबतीत आम्हाला सर्वांनाच कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्यानं हे घडत असलं, तरी ते टाळता आलं असतं.', असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या कामावर नाराजी व्यक्त केली.
त्यासोबतच, 'राजकारणात सत्ता राखण्यासाठी वेगाने हालचाली कराव्या लागतात. परंतु 'महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्प्यात माघार घेतली. त्याचंही कारण शारीरिक अवस्य हेच असावं.' असं देखील या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.