Ahmednagar News : एकीकडे कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना दुसरीकडे कांद्यामुळे शेतमजुरांसमोर अजबच संकट उभं राहिलंय. अहमदनगर जिल्ह्यात कांदा काढणीचे काम करणाऱ्या मजुरांच्या डोळ्यातून अचानक अळ्या निघू लागल्याने एकच खळबळ उडालीये.
राहुरी तालुक्यातील वळण येथे एका शेतात कांदा काढणीचे काम करणाऱ्या महिला मजुरांच्या डोळ्यातून काल अचानक अळ्या निघू लागल्याने भीतीचे वातावरण पसरलंय. काम उरकून घरी परतलेल्या १० ते १५ महिलांना रात्रीच्या सुमारास डोळ्यात वेदना सुरू झाल्या आणि हा प्रकार समोर आला.
या प्रकारामुळे घाबरून गेलेल्या महिलांनी एका खाजगी रुग्णालयात डोळ्यांची तपासणी करून प्राथमिक उपचार घेतलेत. डॉक्टरांनी डोळ्यातून बारीक अंडी आणि आळ्या निघत असल्याच्या प्रकाराला पुष्टी दिली आहे. वेळीच योग्य उपचार घेतले नाही तर शरीरात इन्फेक्शन होऊन वेगळ्या व्याधी होण्याचा धोका असल्याचे नेत्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या शेतमजूर महिलांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय.
दरम्यान राहुरी कृषी विद्यापीठाचे शस्त्रज्ञ आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित शेतात जाऊन कांदा पिकाची पहाणी केली. हा प्रकार कांदा माशीच्या किडीमुळे झाल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. कांदा माशीची कीड ही फक्त कांदा आणि लसुन या दोनच पिकांवर पडते. ती जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा कांद्याच्या पापत्र्यात आढळते.
त्यात अळीने अंडी घातल्याने तीच अंडी कांदा काढत्यावेळी मजुरांच्या डोळ्यात गेली आणि त्यातूनच अळ्या निघण्याचा प्रकार घडला. मात्र असा प्रकार क्वचितच एखाद्या ठिकाणी घडतो त्यामुळे शेतक-यांनी घाबरू नये आणि काम करतेवेळी शक्यतो सेफ्टी गॉगल वापरावा, असे अवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कांदा कीटकनाशक शास्त्रज्ञ डाॅ. भारत पाटील यांनी केलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.