परभणी: सेलू तालुक्यातील नरसापुर गावाकडे जाणाऱ्या करपरा नदीवर स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत पूल उभारला गेला नाही. या पावसाळ्यात ग्रामस्थांना अनेक जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी दि. 17 सप्टेंबर रोजी येथील एका, ग्रामस्थाचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. झालेल्या पावसाने करपरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आज औरंगाबाद येथून रुग्णवाहिकेने मृतदेह आणण्यात आला सदर व्यक्तीचा मृतदेह बैलगाडीत टाकून गावाकडे न्यावा लागला. अशा अनेक जीवघेण्या संकटाला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. ऑगस्ट महिन्यात देखील एक व्यक्ती पूर ओलांडताना वाहून गेला होता. गतवर्षी अशीच एक घटना 11 ऑक्टोबर 2020 रोजी घडली होती. एका 8 वर्षाच्या मुलाला सर्पदंश झाला. त्यावेळी या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने करपरा नदीला पूर आला होता.
सर्पदंश झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात येण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना व ग्रामस्थांना पुराचा सामना करावा लागला. गावातील 10 ते 15 तरुणांनी, नागरीकांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर पुरातून दोरीच्या सहाय्याने नदी ओलांडून त्या मुलास जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सुदैवाने त्याचे प्राण वाचले, तो सुखरूप घरी आला.
स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत नरसापुर गावाकडे जाणाऱ्या करपरा नदीवर पुल नसल्याने अशा अनेक जीव घेण्या प्रसंगाला नागरीकांना सामोरे जावे लागते. ग्रामस्थांनी नदीवर पुल उभारणीसाठी मागणी केली आहे. मात्र अद्यापही याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.