>> सचिन बनसोडे
अहमदनगर : अकोले शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारले जावे या मागणीसाठी आज भव्य मोर्चा काढण्यात आला होता. राज्यभरातील हजारो आंबेडकर प्रेमी या मोर्चात सहभागी झाले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे अगस्ती साखर कारखाना चौकात समाजाची तीस गुंठे जागा आहे. तिथे झालेल्या अतिक्रमणाविरोधात मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिल्यानंतर काल शासनाने तात्काळ हे अतिक्रमण काढले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली मागणी आता राज्य सरकारने पूर्ण करावी आणि ही जागा स्मारक समितीला दिली जावी, अशी मागणी करत आज भव्य मोर्चा काढला होता.
मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच आंबेडकर प्रेमी महिला, पुरूष या मोर्चात सहभागी झाले होते. अकोले तालुक्याचे आजी माजी आमदार आणि सर्वपक्षीय नेते या मोर्चात सहभागी झाले होते. आघाडी सरकारच्या काळात स्मारकासाठी पाच कोटी रूपये निधी दिला जाणार होता. मात्र सरकार बदलले आणि हे काम होऊ शकले नाही. आता विरोधी पक्षात जरी असलो तरी या स्मारकासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचं मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी म्हटलं.(Maharashtra News)
या मोर्चात आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजय वाकचौरे, आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते, संघराज रुपवते, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भिमा बागुल, किसान सभेचे अजित नवले, सागर शिंदे आदींसह राज्यभरातून आलेले महिला, पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited by- Pravin Wakchoure
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.